Pages

Wednesday, November 17, 2010

दाजीपुर गवा अभयारण्य २५-०३-२००३




यावेळी सगळ्यात मोठी टीम होती ट्रेकवर जाण्यासाठी. मी, उदय,प्रवीण,महेश,सागर,समीर व आशुतोष मोठी टीम !! कारण जास्त लोक असले की प्राणी दिसत नाहीत असे मला वाटते त्यामुळे जास्त लोक नसतात. पण यावेळी ६ जण आणि सगळे नवनवीन गडी. शांत चालायचे अशी विनंती करून आम्ही दाजीपुरला रवाना झालो.
सकाळी ८ वाजता शिरवळ स्टॅंडवरुन कोल्हापूरचा प्रवास सुरू झाला. कॉलेजमध्ये असल्या कारणाने जवळ जास्त पैसे नसायचे त्यामुळे एसटी भाडे परवडत नसे. त्यामुळे थोडी प्रवास भाड्यामध्ये तडजोड करून आमचा प्रवास टेंपोच्या टपा वरुन सुरू केला. गप्पा, ट्रेक चे प्लॅनिंग, गाणी म्हणत प्रवास चालू होता. दुपारी एकला कोल्हापूरला पोहोचलो. निघताना सकाळ होती. कोवळे उन्ह बरे वाटत होते टेंपोच्या टपावर पण दुपार पर्यंत उन्हा ने करपून गेलो.प्रवासात उन्हा पासून वाचण्यासाठी चटई ,चादर बाहेर निघाली होती. ती परत बॅग मध्ये भरून कोल्हापूर स्टॅंड गाठले. कोल्हापूर वरुन गाडी पकडून आम्ही ४ ला दाजीपुरला पोहोचलो. नदीवर मस्त पैकी पोहून घेतले. चहा मारुन संध्याकाळी ७ ला अभयारण्याचा रस्ता धरला. पहिला मुक्काम २१ किमी दूर असणार्‍या टॉवर वर करण्याचा बेत होता. झप झप पाऊले उचलत डिगस गावाचा रस्ता धरला. निरव शांतता होती फक्त आमच्या पाऊलाचा आवाज येत होता. अगदी एक किमीच चाललो असेल तेवढ्यात सगळी शांतात भंग पावली. रस्त्याच्या कडेलाच एक सांबर भेदरुन ओरडल्याचा आवाज आला. त्या शांततेत आवाज अगदी मोठा येत होता आणी घुमत ही होता. आणि आमच्या पासून जास्त अंतर ही नव्हते.


ते आम्हाला बघून ओरडले का कोणता शिकारी प्राणी होता आजूबाजूला काहीच कळले नाही. ५-६ वेळा ओरडून ते दूर गेले आणी शांत झाले. आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. वाटेत डाव्या बाजूला झाडी मध्ये हालचाल जाणवली. टॉर्च त्या दिशेला मारला पण काही दिसत नव्हते. थोडा पुढे जाऊन पहिले तर एक प्राणी दिसला. झाडी मध्ये इकडे तिकडे भक्ष्य शोधताना तो प्राणी माझ्या दृष्टीस पडला. ते खवल्या मांजर असावे. माझी चाहूल लागून ते लगेच दूर पळून गेले. गगनगिरी आश्रमा पर्यंत आम्हाला सांबराचे आवाज, खवल्या मांजर आणि ससा दिसला होता. तिथून जरा पुढे निघालो आणि वाघाच्या पाण्याचा रस्ता धरला. आश्रमापासून थोडे पुढे गेल्या वर डाव्या बाजूला आमच्या पासून ५० मी. वर एक सांबर बसलेले दिसले. शांतपणे बसून ते आमच्या कडे पाहत होते. थोडा वेळ तसेच बसून राहीले आम्ही ही थोडे पुढे गेलो. २-३ पाऊले पुढे गेलो असेल की लगेच ते उठले आणि झाडी मध्ये दिसेनासे झाले. कुठेही न थांबता एकदम वाघाच्या पाण्यावर थांबायाचे ठरवले होते. रात्री ११:३० ला आम्ही वाघाच्या पाण्यावर पोहोचलो. खाली उतरून पाणी पिले आणि बाटल्या ही भरून घेतल्या. थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही टॉवरकडे कूच केली.


टॉवर आता ५-६ किमी दूर राहिला होता. पाऊले झपझप पडत होती. जंगलातून चालताना मी कोणालाही बोलू देत नव्हतो. बोलण्या मुळे प्राणी जवळ ही थांबणार नाही आणि आपल्याला काहीही दिसणार नाही असे मला वाटत होते. त्यामुळे कोणीही बोलत नव्हते सगळेजण शांतपणे चालत होते. मध्यरात्री २ ला आम्ही टॉवरला पोहोचलो. टॉवरच्या पलीकडे पाण्याचा तलाव आहे. तिथे पाणी आहे का नाही ते पाहण्यासाठी मी आणि महेश (आण्णा) तिकडे जाऊ लागलो. बरोबर टॉर्च होताच. टॉर्चच्या प्रकाशात लांबवर दोन डोळे चमकताना दिसले. तिकडे चालत जाऊन कोणता प्राणी आहे हे पाहण्याचा जाम कंटाळा आला होता. त्यामुळे पुन्हा तलावाकडे फिरलो. पण तिथे पाणी नव्हते. तलाव पूर्ण आटला होता. साहजिकच आहे .. मार्च चे दिवस होते. आता वाघाच्या पाण्यावरुन जे पाणी आणले होते त्यावरच रात्र काढावी लागणार होती. ब्रेड जॅम लोणचे खाऊन घेतले .. आणि झोपलो. २१-२२ किमी ची पायपीट झाल्यामुळे लगेच २-३ टाळकि घोरायला लागली. घोरणे ते काय ?? अवर्णनीय असे वेग वेगळे आवाज निघत होते. ते सगळे ऐकत ऐकत मला ही झोप लागली.. सकाळी ७:३० ला मला आणि उदयला जाग आली. लगेच दुर्बिण घेऊन आम्ही मनोर्यावर चढलो. परिसर न्याहाळत असताना


उदय ने मला एक विचित्र गोष्ट दाखवली. एक सांबर निवांत झोपल्या सारखे दिसत होते. आम्ही लगेच खाली उतरलो आणि त्याच्या दिशेने चालू लागलो. पण तरीही ते हलत नव्हते मग आम्हाला जाणवले की ते मेले आहे. त्यामुळे अजुनच सावध झालो कारण जर एखाद्या प्राण्याने त्याची शिकार केली असेल तर तो आजूबाजूलाच बसला असण्यचि शक्यता आहे. सांबराचे शरीर आहे तसे होते. कोणताही भाग खाल्याचे दिसत नव्हते. आम्ही जस जसे पुढे जाऊ लागलो तसा प्रकार आमच्या लक्षात आला. हे कोणत्या वन्य प्राण्याचे नाही तर त्याच्या ही पेक्षा हिंस्त्र आणि तेवढ्याच क्षुद्र प्राण्याचे हे काम होते. आम्ही ही त्याच वंशातले होतो याची आम्हाला लाज वाटते. सांबरापाशी पोहोचल्या वर त्याच्या छाती मध्ये एक गोळी आणि मांडीवर एक गोळीची जखम दिसली. बिचार्‍याने बराच वेळ तडफडून जीव सोडल्याच्या खुणा दिसत होत्या. जीभ बाहेर आणि डोळे उघडेच होते. प्रकार पाहून खूप दुख झाले. जबरदस्त जनावर होते. ती एक पूर्ण वाढ झालेली मादी होती. त्याचे फोटो काढून आम्ही परत मनोर्‍याकडे परतलो. सगळ्यानी एक एक इरसाल शिवी त्या शिकार्‍याला दिली. आता तेवढेच आमच्या हातात होते. अभयरण्या मध्ये बघितलेला हा दुसरा प्रकार.


खिन्न मना ने समान परत बॅग मध्ये भरून आम्ही सांबर कोंडा चा रस्ता धरला. सकाळी १० ला आम्ही सांबरकोंडा ला पोहोचलो. तिथे पणि भरपुर होते. त्यामुळे मुक्काम तिथेच करायचा ठरले. मी प्रवीण आणि आशुतोष आम्ही पणि भरून आणण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागलो. तिथे एका झुडुपातून पिसोरि हरण पाळताना दिसले.
ट्रेक मधला पहिला मसाले भात तयार करण्यासाठी साहित्य बाहेर निघाले. मस्त पैकी जेवणाचा बेत उरकून सगळे झोपण्यास सज्ज झाले. मी उदय, सागर आणि प्रवीण जरा आजूबाजूच्या जंगलामध्ये फिरायला जायचे ठरवले होते. तसे आम्ही निघालो.
एका तळ्याच्या काठी आम्हाला प्राण्याचे भरपूर ठसे दिसले. तिथेच जरा शांत पणे बसायचे ठरवले. थोड्यावेळा ने समोरच्या झाडावर एक स्वर्गीय नर्तक आला. त्याचे थोडे फोटो काढून घेतले. ४ वाजता आम्ही तिथून उठलो आणि मुक्कामा च्या ठिकाणी पोहोचलो. मुक्काम तिथेच होता त्यामुळे दिवसा उजेडीच खिचडी करून घेण्याचे ठरले. पुन्हा तीच तयारी. खिचडी खाऊन घेतली. जंगलाच्या अगदी मध्ये मुक्काम असल्याकारणाने रात्रभर कोणी तरी जागे राहून पहारा देणे गरजेचे होते. त्यामुळे सगळ्याची २-२ तासाची ड्यूटी लागली. वर्ल्डकप चालू होता आणि आज इंग्लेंड आणि भारता ची मॅच होती. त्याची कॉमिंट्री थोडावेळ ऐकली व झोपी गेलो .. माझी शिफ्ट पहाटे ४ ची होती. ३-४ च्या दरम्यान एक उदमांजर खूप जोरजोरात ओरडत होते. शांततेत तो आवाज अतिशय भीषण वाटत होता. बराच वेळ ओरडत होते ते उदमांजर. माझी शिफ्ट सुरू झाली होती. मी त्याचे आवाज ऐकत ऐकत शेकोटी पाशी बसून होतो.


सकाळ झाली एक एक जण उठू लागला. ७ च्या दरम्यान एक मोठा पक्षी वारा कापत आमच्या डोक्यावरुन उडत गेला. पंखा च्या आवाजा मुळे सगळयांचे लक्ष तिकडे गेले. तो एक इंडियन पाइड हॉर्नबिल होता. दूरवर जाऊन तो एका झाडा वर बसला. थोडा वेळ त्याला न्याहाळले. पुन्हा पंखा चा भव्य विस्तार उलगडून तो सुंदर पक्षी दिसेनासा झाला .
आता जरा बसून चर्चा करून पुढचा प्लान करत होतो. २ दिवस राहिल्यावर प्राणी, पक्षी, निसर्ग पाहून बर्‍याच जणांचे मत होते की अजुन एक दिवस मुक्काम करायचा. अजुन दाट जंगलामध्ये जायचे. मला तर चार दिवस मुक्काम वाढवला असता तरी काहीही प्रॉब्लेम नव्हता. पण एकच माणूस याचा विरोध करत होता. आम्ही सामानाची आवारा आवर करून वाघाचे पाण्याचा रस्ता धरला. सगळे जण त्या विरुद्ध पार्टीच्या माणसाला समजवण्या साठी त्याच्या मागे पुढे मागे पुढे करत होते. पण तो त्याच्या विचारावर ठाम होता. वाघाचे पाणी आले सुद्धा पण काहीही उपयोग झाला नाही. तो नाही ते नाही तयार झाला. मी त्याला काही समाजवण्याचा प्रयत्न केला नाही. वाघाच्या पाण्यावर सगळे पोहोचले. पाण्यापाशी उतरलो. माझे आधीच डोके फिरले होते त्यात समीर मला काही तरी म्हणाला. मी त्याच्यावरच चिडलो. त्याने लगेच माझ्या तोंडावर एक म्हण फेकली "वड्या चे तेल वाग्या वर काढू नकोस. "..... झाले !!!!! उदय ने लगेच आशुतोष म्हणजे ज्याच्या मुळे ग्रूप मध्ये चीड चीड झाली होती त्याला सांगितले की समीर तुला वडा म्हणत आहे. त्याच्या या वाक्या मुळे सगळीकडे हाशा पिकला. पण आशुतोष वर काहीही फरक पडला नाही आणी आम्हाला दाजीपुर चा रस्ता धरावा लागला.

यावेळी तर प्राणी दिवसा उजेडी दिसलेच नाहीत पण रात्री बरेच प्राणी दिसले.
त्याचा तपशिल नकाशा खाली देत आहे ....





1 comment:

  1. Nilesh Saheb ajun barich majja aali hoti dajipur la...tula ha blog ajun changla lihta aala asta...ajun g**d fate karaykram zaale...babuji tumche kai mhane aahe hya badal ??

    Thanks,
    Praveenkumar Gaikwad

    ReplyDelete