Pages

Wednesday, November 24, 2010

पुन्हा एकदा वासोटा (०७-जून-२००३)

-------------------------------------------------------------------------------------


***************** वासोटा किल्ल्या वरील सुंदर हनुमान मूर्ती********


कोयना आणि वासोटा ट्रेक करण्याची ही माझी ६ वि वेळ. माझी सगळ्यात आवडती जागा. नागेश्वरच्या मंदिरामध्ये बसून समोर दिसणारा तो कोकण परिसर, ती नागेश्वराची सुंदर गुहा, तिथे असणारी ती रेखीव पिंड आणी त्यावर होणारा पाण्याचा अखंड अभिषेक. डाव्या बाजूला दिसणारा उंचपुरा वासोटा किल्ला, त्याच्या मागच्या बाजूला मीच तुझ्या पेक्षा उंच असे सागणारा जुना वसोटा आणि त्याचा बाबू कडा. गुहेच्या उजव्या बाजूच्या दरी कडे गेल्यावर दिसणारी डोंगराची बाळे. तिथे तासतास बसून राहावेसे वाटते. तिथे बसल्यावर दरीमध्ये अचानक एखादे उदमांजर नजरेस पडते. गरूड उडताना दिसतो, माकडाची टोळी खाद्य शोधायला निघताना दिसते. दुरून दरीमधून निळा शैल कस्तुरची शिटी कानावर पडते. संध्याकाळी भेकराचे आवाज ऐकू येतात.कसा कंटाळा येईल हो या सगळ्या गोष्टींचा कोणाला. दरवेळी काही तरी नवीन दाखवतो हा मला. असे हे सगळे वैभव कोणाला पहावेसे वाटणार नाही. म्हणून जमेल तेंव्हा जाऊन यायचे वासोट्याला.
तसाच पुन्हा एकदा निघालो अगदी ४ वर्षे हॉस्टेलवर राहिलेला विद्यार्थी ज्या ओढीने घरी जातो त्याच ओढीने.
पुन्हा वासोट्याला जायचे या खुशीमध्ये मी सगळी तयारी केली. यावेळी सुद्धा आम्ही ४ जणच होतो. मी, उदय,सागर आणि प्रविण. मी आणि उदय आधी वासोट्याला येऊन गेलो होतो पण सागर आणि प्रविण नवीन होते.
७-६-२००३ रोजी सकाळी ९ वाजता सातार्‍याला पोहोचलो. राहिलेली खरेदी करून आम्ही १० च्या बामाणोलि गाडीमध्ये बसलो. बामाणोलि ला १२ ला पोहोचलो. वन आधिकार्यांची रीतसर परवानगी घेऊन आम्ही एका खाजगी लॉंच ने कुसापूरचा रस्ता धरला. २:३० च्या दरम्यान आम्ही कुसापूरच्या हद्दी मध्ये पोहोचलो. बॅग बाजूला ठेवून कपडे काढून मनसोक्त शिवसागराच्या पाण्यामध्ये डुंबलो. पाण्यामध्ये बराच वेळ पळापळ, मारामार्‍या करून झाल्या. मग उदयने कुठून काय कल्पना आणली. सगळ्यानी आजूबाजूला असणारी माती सर्वांगाला लावली. डुककर किंवा गवे जसे चिखलामध्ये लोळतात त्याप्रमाणे आम्ही लोळलो. चिखल वाळेपर्यंत असेच बसलो आणि मग एकमेकांची अंगे घासून आंघोळी उरकत्या घेतल्या. इतके उद्योग केल्या मुळे भुका जाम लागल्या होत्या.
एका पिम्पळाच्या झाडा खाली बसून जेवण उरकून घेतले व नागेश्वरचा रस्ता धरला. रस्त्यामध्ये एका दगडाच्या बेचकीत मला चंडोल पक्षाचे वाटी सारखे घरटे दिसले. त्यामध्ये राखी चॉकलेटी ठिपके असलेली ३ अंडी होती. सगळ्याना अंडी आणि ते सुंदर घरटे दाखवून पुढची वाट धरली. गावा मध्ये एक मुलगा भेटला. त्याला मी लगेच ओळखले. मी, उदय आणि दुष्यंत प्रथम जेंव्हा कोयना अभयारण्यामध्ये फिरायला आलो होतो तेंव्हा हा मुलगा आमचा वाटाड्या होता. त्यानेच आम्हाला यावेळी नागेश्वरची वाट दाखवली. करवदे, आळु, आंबे खातखात आमचा प्रवास चालू होता. करवदे, आळु, आंबे च्या नादा मध्ये आम्ही रस्ता चुकलो आणि दुसर्‍याच रस्त्या ने चालू लागलो होतो. मग एक कारवि चे रान तुडवत मूळ रस्त्याला लागलो.
त्याच रस्त्याने पुढे एक डोंगरची चढण आहे ती चढायला सुरूवात केली. चढावर चालण्याचा खूप त्रास होत होता .. खूप दम लागत होता.
प्रवीणला तर चालणे अवघड झाले होते. बसत बसत आम्ही नागेश्वरकडे सरकत होतो. संध्याकाळच्या आत नागेश्वरला पोहोचणे गरजेचे होते. त्यामुळे पुन्हा चालायला सुरूवात केली. मी आणि उदय पुढे चालत होतो. सागर आणि प्रवीण मगेच होते. आम्हालाही खूप दम लागत होता. मजल दरमजल करत सरकायचे आम्ही ठरवले... तसेच चाललो होतो मजल दरमजल करत पण तोंडाने पण म्हणायचे मजल आणि दरमजल ही आइडिया बंडा उर्फ उदयची . मी मजल म्हणून एक पाऊल टाकायचो, तो दरमजल म्हणून एक पाऊल टाकायचा. असे करत करत आम्ही बरेच पुढे आलो. मागे यांची काहीही चाहूल लागत नव्हती.

**************************************मी स्वता:

****बंडा (वेगळीच पोज)****

तरी आम्ही न थांबता पुढे चालत गेलो आणि एका टेकडीवर पोहोचलो. तिथे बसून यांची वाट पाहावी असे ठरवले होते. जवळ पाणी ही कमी होते. फक्त १ बाटली शिल्लक होती आणि त्याला सुद्धा अंबुस असा घाणेरडा वास येत होता. मला तो वाससुद्धा सहन होत नव्हता त्यामुळे पाणी पिणे दूरच. वर माथ्यावर असणार्‍या मन्दिरा समोरील झर्याचे पाणी पिण्याचे मी ठरवले होते. यांची वाट पाहत अर्धा तास आम्ही तिथेच बसून होतो आणि आजूबाजूचा परिसर न्याहाळत होतो पण यांचा काही पत्ताच नाही.. समोरचे शिवसागर जलाशय आणि परिसर पाहण्यात वेळ कसा गेला कळलेच नाही... मग एकदम आम्ही त्याना हाका मारायला सुरूवात केली. थोडा वेळाने प्रतिसाद मिळाला व ते वर चढताना दिसू लागले. मग आम्ही ही उठलो आणि एकदम मन्दिरा पाशी थांबायाचे असे ठरवून चालू लागलो. सतत आमची नजर वर किती चढन शिल्लक आहे हे पाहण्यासाठी जात होती. मंदिर टप्प्या मध्ये आले होते. तिथेच एक मोठी पांढरी वस्तू चमकताना दिसत होती. ती होती गव्याची कवटी. ती उचलून बंडाने एका खडका वर आणली. मी लगेच आजूबाजूला पाण्याचा झरा शोधण्यासाठी निघालो. पण प्रवाह पूर्ण कोरडा ठणठणीत होता. मला तिथे ही पाणी मिळाले नाही. काही वेळात हे दोघे ही येऊन पोहोचले. दोघे पूर्णपणे आडवे झाले.प्रवीणला चालण्याचा खूप त्रास होत होता. थोडावेळ विश्रांती घेऊन आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. हा पुढचा टप्पा पूर्णपणे गर्द झाडीमधून होता आणि जास्त चढ सुद्धा नव्हता. मी माझ्या मागे उदय, सागर आणि शेवटी प्रवीण असे आम्ही चालत होतो. मला या वाटेची पूर्ण माहिती असल्याने मी सगळ्यात पुढे असायचो. प्रवीण ने मला कप्तान पदवी बहाल केली होती. संध्याकाळी ६ ला आम्ही झाडीच्या टोकाला येऊन पोहोचलो .. समोर एक विस्तीर्ण पठार आहे त्यावर संध्याकाळी गवे चरायला आले असण्याची शक्यता होती.

*************गवा (शिंग मोडलेला)
त्यामुळे सगळ्याना शांत चालण्याची सूचना करून पुढे चालू लागलो. झाडीच्या समोरच एक गवा चारताना दिसला. तो एक भला मोठा नर होता. मी सगळ्याना खाली बसण्याचा इशारा केला आणीं कॅमेरा सज्ज केला. आजूबाजूला ३ गवे आणि एक पिल्लू चारताना दिसले. सगळ्याना गवे दाखवले व त्यांचे फोटो काढण्यासाठी पुढे सरकलो. पण लेन्सवर सूर्यकिरण येत होते त्यामुळे थोडा उजवीकडे जाऊन फोटो काढायचे ठरवले व शांतपणे सरकू लागलो. तेवढ्यात माझ्या पायाखाली काटकी मोडली व गवे सावध होऊन आवाजाच्या दिशेला पाहु लागले. मी लगेच फोटो काढला. कॅमेराचा आवाज ऐकून सगळे पळू लागले. मी झाडीतून बाहेर आलो आणि फोटो घेऊ लागलो. सगळे गवे झाडीमध्ये पळुन गेले पण नर तसाच थांबून माझ्याकडे पाहत होता. मी पण त्याच्याकडे सरकू लागलो. या गव्याचे उजवे शिंग वळून खाली कानापाशी आले होते. त्याचा फोटो घेतला .. तो सुद्धा पळत झाडी मध्ये अदृश्य झाला..
गव्यांच्या दर्शनाने ४ तहानलेले जीव ताजेतवाने झाले होते. ६:१५ झाले होते. समोर नागेश्वरचा सुळका दिसू लागला. पायाना पण वेग आला होता. आजूबाजूचे डोंगर दर्या पाहून प्रवीण आणि सागर चक्रावून गेले. बराच वेळ ते एकडे तिकडे बघत बसले. दरीचे फोटो घेऊन आम्ही पुढचा रस्ता धरला. डावी कडे दरी मध्ये २-३ गवे चारताना दिसले. थोड्याच वेळामध्ये आम्ही
*********************नागेश्वर मंदिर***********************

नागेश्वरला पोहोचलो. आता तहानलेल्या घश्यानी डोके वर काढले होते. भरपूर पाणी प्यावे असे सगळ्यानाच वाटत होते. कुंडाकडे जाण्याआधी बाटली मध्ये जे पाणी होते ते सुद्धा फेकून बाटली स्वच्छ धुवून घेतली. मसालेभात करण्यासाठी लागणारे सगळे समान काढून आम्ही कुंडाचा रस्ता धरला. कधी तिथे पोहचतो आणि भरपुर पाणी पितो असे झाले होते. कुंडावर पोहोचलो आणि टॉर्चचा प्रकाश कुंडा मध्ये टाकला. डोक्याला हात लावण्याची वेळ आली. कुंडा मध्ये थेंबभर सुद्धा पाणी नव्हते.
माझे आधीच कोरडे पडलेले तोंड अजुन कोरडे झाले. रात्री जेवण नाही, पाणी नाही तसेच झोपावे लागणार होते. आता जवळपास पाणी मिळणे अशक्य . आता पाणी फक्त वासोटा किल्ल्यावरच त्यामुळे रात्रीच किल्ल्यावर जायचा विचार मनात येऊ लागला. पण प्राणी आणि इतर श्वपदांचे भय होतेच की. त्यामुळे तो विचार मनातून काढून टाकला आणि गुहे कडे परतलो.
नागेश्वराच्या गुहेमध्ये छतातून १२ महिने १८ काळ पाणी ठिपकत असते. त्याच्या ठिबकण्याने तिथे ठेवलेला तांब्या भरला होता. तांब्या कसला गडू होता. सगळ्यानी त्यामधील घोट घोट पाणी प्यायले. गुहेत चढताना पायार्‍याच्या उजव्या बाजूला असाच एक छोटासा खळगा आहे तिथे ही पाणी असण्याची शक्यता होती. तिथे ही घोट भर पाणी होते. पण ते पीणार कसे . एक कल्पना सुचली. एक पेन घेतल त्याची रिफील,टोपण काढून त्याचा स्ट्रो तयार केला आणि त्या घोटभर पाण्याचा चुसका मारला व तो खडडा अजुन खोल आणि साफ करून ठेवला जेणे करून जास्त पाणी साठेल.
रात्री बरोबर आणलेल्या तिखट पुर्‍या आणि गुळ असे काहीसे विचित्र जेवण करून घेतले. उदय आणि सागरने तर भरपुर कांदा खाल्ला. बिछने पसरून आम्ही झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. पण छे !!! मला आणि उदयला आजिबात झोप लागत नव्हती. सागर आणि प्रवीण मस्त पैकी डाराडुर. आमचा ही थोड्या वेळा ने डोळा लागल्या सारखा झाला. पण मध्या रात्री पुन्हा जाग आली. तोंड पूर्ण कोरडे पडले होते. खाळग्यामध्ये पाणी साठले आहे का पाहण्यासाठी उठलो. बंडा पण होतच जागा. तो सुद्धा आला. मी तर स्ट्रो घेउनच होतो. पण त्या खाळग्यावर जे जीव रोज पाणी पितात त्यातील एक जीव तिथे बसून आधीच जिभल्या चाटात होता. ती होती एक भली मोठी पाल. तिचे पाणी पिऊन झाले होते आता ती तिच्या मोठ्या जिभे ने डोळे, ओठ नाक साफ करत बसली होती. तो प्रकार पाहून बंडा पाणी पिण्यास तयार होईना. पण मी पुन्हा एकदा चुसका मारला आणि सकाळ ची वाट बघत बिछान्या वर पडलो. रात्री थोडा डोळा लागला की लगेच पाण्या ची स्वप्ने पडत होती. आई मला तांब्याभर थंडगार पाणी देत आहे असे स्वप्न मला सारखे पडत होते. पण हे दोघे गाढ झोपले. मला पाण्याची स्वप्ने आणि सागर काय माहीत कसली स्वप्ने पडत होती, तो मोठमोठ्याने ओरडत आणि शिव्या देत होता. माझे तर हसून ह्सून पोट दुखण्याची वेळ आली होती. बंडा म्हणाला तो तुलाच शिव्या देत आहे इकडे आणल्या बद्दल. आम्ही पण त्याला उठवत नव्हतो. त्याचा आरडाओरड ऐकायला मज्जा येत होती. सकाळी कळले की त्याला झोपेमध्ये चावळण्याची सवय आहे.
सकाळी ज्यानी पाण्यामध्ये उच्छाद मंडला होता रात्री त्यांच्यावर अशी वेळ येईल असे वाटले ही नव्हते.
************************************सकाळी धुके नागेश्वर मंदिरामधून***************

सकाळी लवकर उठून वासोटा गाठायचा ठरले होते. पण लवकर उठून ही काहीही उपयोग झाला नाही. जाम धुके पडले होते. आमच्या चादरी ओल्या झाल्या होत्या. समोर निळा शैल कस्तुर शिळ घालत होता. धुके पाहत बसण्याची अजिबात इच्छा नव्हती. ७ ला थोडे धुके कमी झाले आणि आम्ही वासोट्याच्या दिशेला चालू लागलो. काल दुपार पासून तहानलेलो होतो. वासोट्याला पाणी नक्की मिळणार त्यामुळे पाऊले झपझप पडत होती. तोंड पुन्हा कोरडे पडू लागले. झाडाझुडपाच्या पानावरचे पाणी चाटुन तोंड थोडे फार ओले करण्याचा प्रयत्न चालू होता. काळ पासून चालून चालून शरीरातून पूर्ण घाम निघाला होता त्या बरोबर क्षर निघत होते. अंगावर मिठासारखा थर जमा झाला होता.
गर्द झाडीतून प्रवास चालू होता. भरपुर चालणे झाले होते पण आता घाम येणे बंद झाले होते. या वर्षी नागेश्वर ते वसोटा मार्गावर सगळ्यात जास्त विसावे पडले होते . खजूर खात, गोळ्या खात आमचा प्रवास चालू होता.
माझे लक्ष्य मात्र काही दिसते का या कडे होते. झाडा चे शेंडे,बुंधे, दगड, झाडाच्या ढोली, सगळे निरखून पाहत मी चाललो होतो. वाटेत बरेच पक्षी दिसले. पण कोणीही काहीही पाहण्याच्या मनस्थीती मध्ये नव्हते. पलपचोळ्या मध्ये मला एक मस्त बेडूक दिसला त्याचे फोटो काढून आम्ही पुढे झालो.
प्रवीणला आता आजिबात चालण्याची शक्ति राहिली नव्हती. कालपासून आम्ही १०-१५ किलोचे समान पाठीवर घेऊन बिना पाण्याचे चालत होतो. त्याचाच परिणाम होता हा. प्रवीण बसेल तिथे आडवा होत होता. आम्ही वासोट्याच्या अगदी पायथ्याला होतो. आता खरा चढ चढायचा होता. त्याला कसे घेऊन जायचे याचा विचार करत होतो . मग मी आणि उदय वर जाऊन पाणी घेऊन यावे असा आग्रह त्याने धरला. तुम्ही हळू हळू वर चालत या, मी आणि उदय जाऊन तो पर्यंत पाणी घेऊन येतो असे सांगून मी आणि उदय गडाकडे निघालो.
आणि गडावर पण पाणी नसेल तर ????? हा विचार येऊन पोटात गोळच आला. मग काय करायचे हे सुद्धा ठरले होते.तिथून सरळ उठून शिव सागर जलाशयाकडे चालत जायचे.. त्यामुळे चालण्याशिवाय पर्याय नव्हता. खूप दम लागत होता. पुन्हा तेच मजल दरमजल म्हणत म्हणत वर चढलो. पाण्याच्या टाकीकडे कूच केले. दोन्हीही टाक्यामध्ये पाणी भरपुर होते.नुसते पाणी बघून पाणी पिण्यपेक्षा ही जास्त आनंद झाला.

***********वासोट्या वरील स्वच्छ सुंदर पाणी.. हा!! हा!! हा!!**************

बाटली भर पाणी काढले आणि भरपूर पाणी पिऊन घेतले. डोके शांत झाले, पोट शांत झाले, शरीर शांत झाले. तहान लागण्याचा आणि पाण्याचा शरीरसाठीच्या उपयोगाचा तो परमोच्च बिंदू होता. पाणी मिळण्याआधीचे शरीर आणि पाणी पिल्या नंतरचे शरीर या मधील फरक लगेच जाणवत होता. आत्तापर्यंत अजिबात घाम येत नव्हता पण पाणी पोटात गेल्या वर घामाच्या धारा सुरू झाल्या. शरिराने स्वता: रोखून धरलेला पाण्याचा प्रवाह आपोआप सुरू झाला. शरीर गार झाले आणि आत्मा थंड झाला. आमचे तर शरीर शांत झाले होते आता त्यांची आठवण झाली.
त्या दोघा ना बोलावाण्या साठी मी दरी च्या टोका वर गेलो. दोघे ही जवळच पोहोचले होते. पाणी भरपुर आहे असे सांगितल्यावर त्यांचाही चालण्याचा वेग वाढला. मी एका बाटलीमध्ये पाणी साखर आणि मिठचे मिश्रण तयार केले. ते पिल्यावर तर अजुनच बरे वाटू लागले. सागर आणि प्रवीणला तेच पाणी प्यायला दिले. थोडा वेळ शांतपणे बसल्यावर प्रवीणला बरे वाटू लागले .. हुरूप आला. काल पासून जेवण ही नीट झाले नव्हते त्यामुळे मसालेभात करण्यासाठी तयारी केली. आता काय पाणी मिळाले होते आणि पोटात ही गेले होते त्यामुळे इकडे तिकडे फिरून जरा निरीक्षण केले. तळ्यकाठी गव्याचे भरपुर ठसे दिसले.

मसालेभात तासाभरात तयार झाला. जेवण चालू असतानाच एक ग्रूप तिथे आला. भात खात खातच पुढचे प्लॅनिंग झाले होते. जेवणानंतर गड फिरायचा ठरले. जेवण झाल्यावर सामान एका झुडुपात लपवून आम्ही बाबूकड्याच्या वाटेला लागलो. रस्त्यामध्ये बर्‍याचवेळा निलगिरी वुड पिजन दिसले. काही वेळात त्या विशाल बाबूकड्या वर पोहोचलो. पाताळात घुसलेली दरी पाहिली की तिथून पॅराग्लाइडिंगच करत जावेसे वाटते. समोरच्या कातळामध्ये काय असेल, तिथे कोणते प्राणी पक्षी असतील. ते आपल्याला कधी पाहायला मिळतील का असे प्रश्न मला पडतात.. समोर जुना वासोटा उभा होता.तिथे कधी तरी जायचे. एक मुक्काम तिथे करायचा असे मी मनाशीच ठरवले आहे. त्याच दिवसाची वाट पाहत आहे मी. तिथे फोटो सेशन झाले आणि आम्ही परत फिरलो. समान उचलून महादेवाच्या मंदिराची वाट धरली.

थोडा वेळ विश्रांती घ्यावी यावर सगळ्याचे एक मत झाले व चटया बाहेर निघाल्या. पडून अर्धाच तास झाला असेल तोच एक पुण्याचा ग्रूप येऊन पोहोचला. त्यानी पाण्यामध्ये टाकायचे औषध मागितले. त्यांचा सुद्धा आज तिथेच मुक्काम पडणार होता. ४ वाजता आम्ही पुन्हा गड फिरायचे ठरवले. समान आवरून आम्ही मारुती मंदिराचा रस्ता धरला. माझा आणि अस्वलाचा झालेला आमना सामना मी कृतीने करून दाखविला. हे सगळे ऐकून झाल्यावर सागर आणि उदयने आड वाटेने ताई तेलिणिच्या वाड्यात प्रवेश केला. मी सुद्धा त्यांच्या मागे निघालो . माझी नजर इकडे तिकडे भीरभिरत होती. तेवढ्यात नजर एका

************************चापडा.*************************

********************चापडा.********************

******************विषदन्त***************

वेटोळ्यावर जाऊन थांबली. तो एक बांबू पीट वाइपर होता. उंच झाडावर शांतपणे बसला होता. लॉंच मध्येच उदय ला मी, मला साप दिसावा अशी इच्छा बोलून दाखवली होती. त्यानेपण माझ्या पाठीवर थाप मारुन दिसणारच साप असा होकार भरला होता आणि माझ्याच मुळे दिसणार असेही म्हणाला.. त्याची ही भविष्यवाणी खरी ठरली साप पण दिसला आणि त्याच्या मुळेच दिसला कारण ते जर आडवाटेने गेले नसते तर मी कशाला गेलो असतो तीकडून आणि मग ते वेटोळे मला कसे दिसले असते. सगळ्याना बोलावून ते झाड दाखवले आणि म्हणालो की या झाडावर एक साप आहे शोधून दाखवा. कोणाला ही तो साप सापडला नाही असा तो मिसळुन गेला होता आजूबाजूच्या रंगामध्ये. त्याचे आहे त्या पोज़ मध्ये फोटो काढून त्याला एका काठीवर घेतले. तिथे त्याचे फोटो काढून त्याला सोडून दिले. तिथून आम्ही नागेश्वराच्या बाजूला असणार्‍या माची वर जाऊन बसलो.

************तुळशी वृंदावन**********
आजूबाजूला गडाच्या कड्यावर सगळीकडे उदमांजराची विष्ठा दिसत होती.
माची वा बसून रात्री खाली दरी मध्ये काही दिसते का हे बघणार होतो. त्याप्रमाणे माची वर स्थानापन्न झालो. ७ वाजले होते. समोर सूर्य नारायण दिवसभरा चे काम संपवून मावळतीला निघाला होता. ते सुंदर दृष्य बघत ओळीने त्या माचीवर बसलो. समोर कारविच्या झाडीमध्ये विसलिंग थ्रश मस्त शिटी मारत बसला होता. खाली एका छोट्याशा मोकळ्या जागे मध्ये एक प्राणी चारताना सागरला दिसला. तो गवा होता.बराच वेळ बसून होतो. ८ वाजत आले होते. आम्ही उठलो आणि मन्दिराकडे जायला निघालो. जंगलामधून घुबडांचा आवाज येत होता. मध्येच एखादा रातावा ही ओरडत होता.

**************चहा तयार झाला.************************


पुण्याहून आलेल्या ग्रूपने मन्दिरा बाहेर पथार्‍या टाकल्या. आम्ही ४ जण आणि त्यांच्यातील २ लहान मेंबर मन्दिरामध्ये झोपणार होतो. गप्पा मारत मारत मसालेभात संपवला आणि झोपण्यासाठी आत गेलो. रात्री चे १०-१०:३० झाले असतील. मस्त झोप लागली होती पण दोन एक तासात एकदम गडबड सुरू झाली. उठून बघतो तर बाहेर पाऊस पडू लागला होता त्यामुळे बाहेर झोपलेले सगळे जण आत मध्ये आले होते. त्या ४ बाय १४ च्या मन्दिरामध्ये १३ जण बसलो होतो. झोपणे तर दूरच पण नीट बसता ही येत नव्हते. गाभारा रिकामा होता पण जिकडे तिकडे मोठ मोठी बिळे आणि कपार्‍या असल्या मुळे आत कोण जात नव्हते. इथे वाकडे तिकडे बसून रहाण्यापेक्षा आत मध्ये नीट झोपता येईल असा विचार करून मी चादर घेऊन सरळ आत गेलो. टॉर्चने सगळी कडे नीट पाहून घेतले आणि तिथे झोपी गेलो. सकाळी ७ ला जाग आली, चहा नाश्ता झाला. आज आम्ही खाली जंगलामध्ये जाणार होतो आणि तो ग्रूप चोरवणे मार्गे खाली कोकणात उतरणार होता. फोन नंबरची देवाणघेवाण करून आम्ही निरोप घेतला. रस्ता सोडून अतिशय अवघड आणि दाट झाडीतून चालू लागलो. सगळे जण एकएकदा आपटले सुद्धा. नुसता काळोख आणि किरर्रर शांतता होती. ओढ्याचे प्रवाह, पडलेले मोठ मोठे ओन्डके पार करत करत आमचा प्रवास चालू होता. मध्येच एखादे मोठे बिळ किंवा गुहा दिसायाची टॉर्च बरोबर होतीच. मग सावधपणे आत डोकवून बघायचे. आजूबाजूला पडलेली हाडे, साळीदरचे काटे निरखायचे, काही ठिकाणी सडलेल्या मटणासारखा वास यायचा. अशा गुहा साळीदरच्या असु शकतात. पुढे एक विशाल पिम्पळ वर्गीय झाड दिसले. ते विशाल झाड पाहून खूप मस्त वाटले.
असे झाड वाढण्यासाठी १००-१५० वर्षा चा काळ लागतो पण माणूस २ मिनिटा मध्ये त्याला जमीनदोस्त करतो.
प्राणी, साप यांच्या बाबता ही मला तेच वाटते. एक एक वर्षे पूर्ण करण्यासाठी त्याना किती नैसर्गिक व अनैसर्गिक सन्कटाना सामोरे जावे लागते. आणि काठी किंवा कुर्‍हाडीच्या एका फटक्यात माणूस त्यांचे हे सगळे कष्ट,प्रयत्न वाया घालवतो, त्यांचे जीवन संपावतो. विचित्र आणि क्रूर पणा ची हद्द असते ती आणि परत एका फटक्यात माराल्याची घाणेरडी मीजास. असह्य आहे असे पहाणे.

******************सागर. ***************
झाडा वर मधामश्यांची भरपूर पोळी होती. झाडाचे फोटो काढून आम्ही पुढचा रस्ता धरला. चालत चालत आम्ही एका नाल्याला येऊन मिळलो. हाच तो नाला नागेश्वरा कडून शिवसागर जलाशयाकडे जातो. आम्ही नागेश्वराच्या दिशेने चालू लागलो. वाटेत भरपूर फुलपाखरे दिसली त्यामध्ये कॉमन क्रो, ब्लू मॉर्मोन, स्ट्राइप्ड टाइगर,ग्लोसी टाइगर,कॉमन गल इत्यादी होती.
काहीवेळा ने डाव्या बाजूला झाडावरुन खाली उतरून काही तरी पळत गेल्याचा आवाज आला. मी पटकन त्यादिशेला झाडी मध्ये शिरलो, फक्त पानांचा आवाज येत होता पण काहीही दिसत नव्हते. तसेच सगळ्याना आत येण्यास सांगून झाडीमधूनच पुढे जाण्याचा निर्णय घेतला. वाटेत भरपूर शेकरू दिसले. आम्ही परतीच्या वाटेवर होतो. ३ वाजले असतील . अजुन बराच वेळ असल्याकारणाने आम्ही एका ठिकाणी बसून काही दिसते का ते पाहणार होतो. एक जागा निवडून स्थानापन्न झालो ... जंगलाच्या मध्येच अगदी मोठे दगड होते आणि आजूबाजूचा परिसर जास्त दाट ही नव्हता. त्यामुळे तिथे काही तरी दिसण्यची शक्यता आहे असे वाटून आम्ही तिथे बसलो. पण बराच वेळ बसून ही काही हालचाल नाही . अजुन किती चालायचे आहे गडावर पोहोचण्यासाठी हे ही माहीत नव्हते. त्यामुळे उठून गडाचा रस्ता धरला. ५ ला पोहोचलो सुद्धा गडावर. पुन्हा भात शिजवायला घेतला. बाकीचे भात करत बसले आणि मी एक लपण करण्यत गुंतलो होतो. तळ्याच्या बाजूलाच जरा दूरवर झुडूपाचा आडोसा घेऊन लपण तयार केले. रात्री तिथे बसण्याचा इरादा होता. कारण सकळि गड उतरताना गडावरुन खाली जाणार्‍या बिबट्यचे ठसे दिसले होते. तो पुन्हा जर पाण्यावर आला आणि आमचे नशीब असेल तर दिसेल. अशी एक अटकळ मनात बाळगून आडोसा तयार करत होतो. आडोसा छान तयार झाला होता.

**********************खिचडी ची तयारी.********************


****************खिचडी चा मस्त तवन्ग.****************
भात खाऊन पुन्हा गडावर साप शोध मोहिम हाती घ्यायची होती. भात खाऊन प्रथम काल दिसलेल्या चापड्यापाशी गेलो. पण तिथे काहीही नव्हते आणि सगळा गड पालथा घातला पण एका पिसोरी हरणाशिवाय काहीही दिसले नाही. पुन्हा मन्दिरापाशी
आलो. अंधार पडू लागला. भात खाऊन गप्पा मारत मन्दिरासमोर बसलो होतो. सगळे कंटाळले होते त्यामुळे रात्री तळयावर जाऊन बसायचा प्रोग्रॅम रद्द झाला आणि तिथेच गप्पा मारत बसावे असे ठरले. बराच वेळ गप्पा टप्पा झाल्या. मला दरीतून सारखा काहीतरी आवाज येत होता पण काही प्राणी असला तरी काय उपयोग, दिसणार तर नाहीच असे समजून आम्ही नुसते आवाज ऐकत होतो. पण शेवटी न राहवून मी उठलो आणि टॉर्च ने खाली शोधू लागलो. दरी न्याहाळत असताना झाडावर २ डोळे चमकले. डोळ्या मागे कळसर भाग दिसला. जरा बाजूला सरकून मी त्याच्या सरळ रेषेत आलो. आता चित्र जरा स्पष्ट झाले .. ते एक टोडि कॅट म्हणजे मसण्या उद होते. झाडा वर एकडे तिकडे भक्ष शोधत फिरत होते. मधूनच ते आजूबाजूला बघत होते. एकदम आमच्या कडे बघितल्यावर त्याचे डोळे हेड लाइट सारखे चमकायचे. थोडावेळ त्याच्याकडे पाहून त्याला त्याचे काम करू देण्यासाठी टॉर्च बंद केला. पण काही वेळात त्या झाडा वरुन बराच जोरजोरात पळण्याचा आणि काटक्या मोडल्याचा आवाज आला. म्हणून पटकन त्या झाडावर प्रकाश टाकला. तिथे अजुन एक प्राणी दिसला ते ब्राउन पाम सिवेट (तपकिरी उद मांजर ) होते. ते मसण्याला हाकलून देण्याचा प्रयत्न करत होते.
मसण्या तपकिरी उद मांजरा कडे लक्ष ठेवून गड चढू लागले. आमच्या अगदी समोरूनच ते गड चढत होते. थोड्याच वेळात ते गड चढून आमच्या समोर आले आणि छोटासा गुरूगुरटा सारखा आवाज काढून पळत दुसर्‍या बाजूच्या काड्यावरुन खाली उतरून गेले.. आम्ही त्याच्या मागे पळालो पण ५ सेकंदा मध्ये ते दिसेनासे ही झाले होते. परत ब्राउन पाम सिवेट पाशी आलो. ते अजुन खालीच काही तरी खात बसले होते.
सागर व प्रवीण झोपण्यासाठी मंदिराकडे गेले. मी आणि उदय त्या सिवेटला न्याहाळत बसलो होतो. ते उदमांजर ही आता वर चढू लागले. ते वर चढून माझ्या अगदी समोर ४-५ फूटावर येऊन बसले. मी त्याच्यावर टॉर्चचा झोत धरला होता. त्याला त्यामुळे काही दिसत नव्हते पण प्रकाशाच्या मागे काही तरी आहे याची जणिव होती. अगदी सावधपणे ते आपले काम करत होते. पाय चाट, कुठे कान खाजव असे उद्योग चालू होते... हे जंगली जनावर माझ्यासमोर अगदी ५ फुटावर बसून हे सगळे करत होते माझा तर विश्वासच बसत नव्हता. थोडावेळा ने साहेबानी आमच्या समोर शी केली आणि पुन्हा खाली उतरू लागले .. जवळ जवळ २-३ मिनिटे ते आमच्या समोर बसले होते. उतरताना सारखे मागे वळून बघत होते. मी त्याला पूर्ण खाली जाई पर्यंत न्याहळत होतो. ते पुन्हा त्याच झाडा वर चढले आणि खाद्य शोधण्यात गुंग झाले. त्याने केलेल्या शी मध्ये बर्‍याच प्रकारच्या बिया होत्या.
सगळी कडे धुके दाटू लागले होते, नाइलाजाने मला उठून मंदिराचा रस्ता धरावा लागला. अन्थरुणावर पडून ही त्या उदमांजरचे चित्र डोळ्या समोरून जात नव्हते. वाईट इतकेच वाटते की त्याला मी कॅमरा मध्ये बंद करू शकलो नाही.

दुसर्‍या दिवशी आम्ही नागेश्वर वरुन खाली चोरवणे गावात उतरून घरी जाणार होतो. निघण्यापुर्वी मारुती मंदिर आणि महादेव मंदिर साफ करण्या चे ठरवले होते. सकाळी उठून नाश्ता करून महादेव मंदिर साफ करण्याचे काम हाती घेतले.
मंदिरासमोर व वर उगवलेली सगळी झाडे काढली. त्यांच्या मुळावर रॉकेल उतून ते पेटवून दिले. झाडाच्या फांद्यानी मंदिराचा परिसर स्वच्छ झाडून घेतला. कडेला विखुरलेली दगडी व्यवस्थित रचली. गाभार्‍यातील कचरा साफ केला. शिवलिंग स्वच्छ धुवून घेतले.. समोर निराजन लावले.. नुसत्या त्या निरंजनाने परिसरात एक वेगळेच चैतन्य जाणवू लागले. महादेवचरणी मस्तक टेकवून आम्ही आमचा मोर्चा मारुती मंदिराकडे वळविला.
गाभार्‍या तील सगळा पालापाचोळा काढून बाहेर भिरकावला. प्रवीण तर कलाकुसरच करत बसला तिथे. आजूबाजूचे दगड एकत्र करून त्याने मंदिरामध्ये जाणारा रस्ता बाजूला असलेला चौथारा सजवला. मंदिराच्या भिंतीवर उगवलेले शेवाळे काढले. मग मारुतीला ही पाण्याचा आभिषेक झाला. दम लागला पण समाधान ही वाटत होते. थोडीशी घोषणा बाजी झाली आणि आम्ही सामानाची आवारा आवर करायला महादेव मंदिरापाशी आलो. समान तसेच उचलून तळे गाठले. हातपाय धुवून जरा तिथेच विसावलो. उदयाला जुन्या वासोट्या वरुन २ मोठे पक्षी उडत येताना दिसले, ते ग्रेट पाइड हॉर्नबिल होते. पंखाचा मोठा आवाज करत ते रेडे घाटामध्ये उतरले. आम्ही पाण्याच्या बाटल्या भरून नागेश्वरचा रस्ता धरला. आता जवळ पाणी भरपुर होते. घड्याळ २ वाजल्या चे दाखवत होते. एकदम तुळशी वृंदावन पाशी थांबायाचे ठरवून आम्ही चालू लागलो. झाडीमध्ये शिरताच आमच्या उजव्या बाजूला काही तरी पळत गेल्याचा आवाज आला. मी पटकन त्या दिशेला पळालो. एक मोठा पूर्ण वाढ झालेला सांबर नर होता. त्याच्या मागे २ माद्या सुद्धा दिसल्या. झाडीमध्ये बरेच शेकरू,वानरे, माकडे दिसली. दीड तासामध्ये नागेश्वर गाठले. पिशव्या तिथेच खाली ठेऊन वर गुहे मध्ये गेलो. २ दिवसा पुर्वी आमची हालत खूप बेकार झाली होती.. इथेच तो मुक्काम होता . आम्हाला तेच तेच आठवत होते. कसा कोणाला त्रास झाला. कोण कसे वागत होते.या पुढे काय करायचे यावर एक परिसांवादच सुरू झाला.
हे सगळे चालू असताना बाहेर ऋतू बदलला. मस्त उन्ह पडलेले होते आता त्यांची जागा काळ्या ढगानि घेतली. सुसट्याचा वारा सुरू झाला. पाऊस सुरू झाला. मोराला आनद व्हावा तसा आम्हाला आनंद झाला. माझे मयूर नृत्य सगळ्यानी मस्त एन्जॉय केले. तिथे असणारा खराटा पीसार्‍या सारखा मागे धरून सैरा वैरा धावलो होतो मी. मस्त मज्जा आली. हसून हसून पार पोटाचा भुगा झाला... पाऊस थांबला नागेश्वरच्या पाया पडून आम्ही खाली उतरू लागलो.

********************नागेश्वर च्या वाटे वरून वासोटा. *****************
थोडे खाली उतरल्यावर दुर्बिण गुहेत राहिल्याचे लक्षात आले. सागर आणि प्रवीण परत वर गेले आणि दुर्बिण घेऊन आले. उतरताना पाय लटलट कपू लागले. बरेच खाली उतरलो . ७ वाजले असतील. बंडाला गुडघ्याचा त्रास जाणवू लागला. त्याला समान घेऊन चालणे शक्य होत नव्हते. त्याचे काही समान सागरने घेतले व चालणे सुरू केले. गाव जवळ आले पण आम्ही रस्ता चुकलो. गावातील दिव्याच्या दिशेने चालायचे ठरवून आम्ही चालू लागलो . पण गाव काही लवकर येईना. आम्ही रस्ता चुकलो आहे हे गावातील एका माणसाला कळले. त्याने लांबूनच रस्ता सांगितला आणि आम्ही रस्त्याला लागलो. आजूबाजूला लाखो काजवे झाडावर गर्दी करून बसले होते. झाडावर रोषणाई केल्या सारखे ते दिसत होते. ते दृश्य बघत आम्ही गाव गाठले. एका वृद्ध माणसाने आम्हाला घरी नेले. पाणी आणि साखर पुढयात देऊन त्याने त्याचा आग्रह केला. त्याला ही माहीत होते की जास्त परिश्रम झाल्यावर गोड काहीतरी शरीरात जाणे जरुरीचे असते.. आम्ही ते खाऊन त्यांचा निरोप घेतला आणि मंदिर गाठले.
मंदिरामध्ये पोहोचल्या वर हातपंपा खाली मस्त पैकी आंघोळी करून घेतल्या ३ दिवसानि आंघोळी करत होतो. अंग मोकळे मोकळे वाटू लागले. ताजेतवाने झालो. मग जेवणचि तयारी सुरू केली. गावातील एका व्यक्तीने स्टॉव्ह आणून दिला त्यामुळे भात शिजवायला जास्त त्रास झाला नाही. ११:०० ला जेवण झाले आणि आम्ही झोपायला मांदिरामध्ये गेलो.
मंदिर अतिशय सुंदर होते. नवीन बांधणीचे होते, पण कलाकुसर चांगली होती, जागा ही प्रशस्त होती. आजूबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष पडलेले दिसले. मंदिरासमोर एक मोठे पिम्पळाचे झाड आहे. सकाळी त्या झाडावर भरपूर पक्षी येतात. एकदा तर मला त्या झाडावर सकाळी सकाळी एक घोरपडी चे पिल्लू ही दिसले होते.
रात्री पुन्हा एकदा सागर झोपे मध्ये ओरडु लागला. शिव्या पण देत होता. पहिल्या दिवशी आम्ही जंगलामध्ये होतो. तिथे हे सगळे शब्द, वाक्यप्रचार ऐकायला कोणीही नव्हते. पण इथे आम्ही आता गावामध्ये होतो. त्याला जरा उठवून शांत झोपायला सांगितले. मी ही मग आडवा झालो.
सकाळी उठून तोंड धुवून घेतले, बाकी तिघे जण प्रत:विधी साठी गेले असताना मंदिरापाशी एक वृद्ध गावकरी आले. त्यांच्याशी गप्पा मारत बसलो. पुर्वी कसा पाऊस पडायचा आता काय बदल झाले आहेत हे ते सांगत होते.
बोलता बोलता त्याने पुढे सांगायला सुरूवात केली. ते ऐकून काहीतरी वेगळेच वाटू लागले. ते गृहस्थ सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेने मध्ये शिपाई होते. ते टोकियोला ही जाऊन आल्याचे ते सांगत होते. मी तल्लीन होऊन त्याच्या गोष्टी ऐकत बसलो. पानसुपारी खाऊन ते घराकडे निघून गेले. झालेली घटना मी पोराना सांगितली. सगळेच म्हणाले मुर्खा फोटो का काढला नाहीस त्यांचा. खरे तर मला काहीच सुचले नव्हते त्यावेळी.
समान आवरून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला.
चोरवणे-चिपळुन-महाड-भोर असा प्रवास करून आम्ही घरी पोहोचलो. वरंध घाटामध्ये २ कोल्हे, साप असे प्राणी ही दिसले.
भरपुर भूक लागली होतो. पण भोर पूर्ण बंद झाले होते. रूमवर जाऊन झोपण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता.
उपाशीच झोपलो.
या ट्रेक मध्ये पाण्यावीना झालेली आमची अवस्था न विसरण्या सारखी होती.



Wednesday, November 17, 2010

दाजीपुर गवा अभयारण्य २५-०३-२००३




यावेळी सगळ्यात मोठी टीम होती ट्रेकवर जाण्यासाठी. मी, उदय,प्रवीण,महेश,सागर,समीर व आशुतोष मोठी टीम !! कारण जास्त लोक असले की प्राणी दिसत नाहीत असे मला वाटते त्यामुळे जास्त लोक नसतात. पण यावेळी ६ जण आणि सगळे नवनवीन गडी. शांत चालायचे अशी विनंती करून आम्ही दाजीपुरला रवाना झालो.
सकाळी ८ वाजता शिरवळ स्टॅंडवरुन कोल्हापूरचा प्रवास सुरू झाला. कॉलेजमध्ये असल्या कारणाने जवळ जास्त पैसे नसायचे त्यामुळे एसटी भाडे परवडत नसे. त्यामुळे थोडी प्रवास भाड्यामध्ये तडजोड करून आमचा प्रवास टेंपोच्या टपा वरुन सुरू केला. गप्पा, ट्रेक चे प्लॅनिंग, गाणी म्हणत प्रवास चालू होता. दुपारी एकला कोल्हापूरला पोहोचलो. निघताना सकाळ होती. कोवळे उन्ह बरे वाटत होते टेंपोच्या टपावर पण दुपार पर्यंत उन्हा ने करपून गेलो.प्रवासात उन्हा पासून वाचण्यासाठी चटई ,चादर बाहेर निघाली होती. ती परत बॅग मध्ये भरून कोल्हापूर स्टॅंड गाठले. कोल्हापूर वरुन गाडी पकडून आम्ही ४ ला दाजीपुरला पोहोचलो. नदीवर मस्त पैकी पोहून घेतले. चहा मारुन संध्याकाळी ७ ला अभयारण्याचा रस्ता धरला. पहिला मुक्काम २१ किमी दूर असणार्‍या टॉवर वर करण्याचा बेत होता. झप झप पाऊले उचलत डिगस गावाचा रस्ता धरला. निरव शांतता होती फक्त आमच्या पाऊलाचा आवाज येत होता. अगदी एक किमीच चाललो असेल तेवढ्यात सगळी शांतात भंग पावली. रस्त्याच्या कडेलाच एक सांबर भेदरुन ओरडल्याचा आवाज आला. त्या शांततेत आवाज अगदी मोठा येत होता आणी घुमत ही होता. आणि आमच्या पासून जास्त अंतर ही नव्हते.


ते आम्हाला बघून ओरडले का कोणता शिकारी प्राणी होता आजूबाजूला काहीच कळले नाही. ५-६ वेळा ओरडून ते दूर गेले आणी शांत झाले. आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. वाटेत डाव्या बाजूला झाडी मध्ये हालचाल जाणवली. टॉर्च त्या दिशेला मारला पण काही दिसत नव्हते. थोडा पुढे जाऊन पहिले तर एक प्राणी दिसला. झाडी मध्ये इकडे तिकडे भक्ष्य शोधताना तो प्राणी माझ्या दृष्टीस पडला. ते खवल्या मांजर असावे. माझी चाहूल लागून ते लगेच दूर पळून गेले. गगनगिरी आश्रमा पर्यंत आम्हाला सांबराचे आवाज, खवल्या मांजर आणि ससा दिसला होता. तिथून जरा पुढे निघालो आणि वाघाच्या पाण्याचा रस्ता धरला. आश्रमापासून थोडे पुढे गेल्या वर डाव्या बाजूला आमच्या पासून ५० मी. वर एक सांबर बसलेले दिसले. शांतपणे बसून ते आमच्या कडे पाहत होते. थोडा वेळ तसेच बसून राहीले आम्ही ही थोडे पुढे गेलो. २-३ पाऊले पुढे गेलो असेल की लगेच ते उठले आणि झाडी मध्ये दिसेनासे झाले. कुठेही न थांबता एकदम वाघाच्या पाण्यावर थांबायाचे ठरवले होते. रात्री ११:३० ला आम्ही वाघाच्या पाण्यावर पोहोचलो. खाली उतरून पाणी पिले आणि बाटल्या ही भरून घेतल्या. थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही टॉवरकडे कूच केली.


टॉवर आता ५-६ किमी दूर राहिला होता. पाऊले झपझप पडत होती. जंगलातून चालताना मी कोणालाही बोलू देत नव्हतो. बोलण्या मुळे प्राणी जवळ ही थांबणार नाही आणि आपल्याला काहीही दिसणार नाही असे मला वाटत होते. त्यामुळे कोणीही बोलत नव्हते सगळेजण शांतपणे चालत होते. मध्यरात्री २ ला आम्ही टॉवरला पोहोचलो. टॉवरच्या पलीकडे पाण्याचा तलाव आहे. तिथे पाणी आहे का नाही ते पाहण्यासाठी मी आणि महेश (आण्णा) तिकडे जाऊ लागलो. बरोबर टॉर्च होताच. टॉर्चच्या प्रकाशात लांबवर दोन डोळे चमकताना दिसले. तिकडे चालत जाऊन कोणता प्राणी आहे हे पाहण्याचा जाम कंटाळा आला होता. त्यामुळे पुन्हा तलावाकडे फिरलो. पण तिथे पाणी नव्हते. तलाव पूर्ण आटला होता. साहजिकच आहे .. मार्च चे दिवस होते. आता वाघाच्या पाण्यावरुन जे पाणी आणले होते त्यावरच रात्र काढावी लागणार होती. ब्रेड जॅम लोणचे खाऊन घेतले .. आणि झोपलो. २१-२२ किमी ची पायपीट झाल्यामुळे लगेच २-३ टाळकि घोरायला लागली. घोरणे ते काय ?? अवर्णनीय असे वेग वेगळे आवाज निघत होते. ते सगळे ऐकत ऐकत मला ही झोप लागली.. सकाळी ७:३० ला मला आणि उदयला जाग आली. लगेच दुर्बिण घेऊन आम्ही मनोर्यावर चढलो. परिसर न्याहाळत असताना


उदय ने मला एक विचित्र गोष्ट दाखवली. एक सांबर निवांत झोपल्या सारखे दिसत होते. आम्ही लगेच खाली उतरलो आणि त्याच्या दिशेने चालू लागलो. पण तरीही ते हलत नव्हते मग आम्हाला जाणवले की ते मेले आहे. त्यामुळे अजुनच सावध झालो कारण जर एखाद्या प्राण्याने त्याची शिकार केली असेल तर तो आजूबाजूलाच बसला असण्यचि शक्यता आहे. सांबराचे शरीर आहे तसे होते. कोणताही भाग खाल्याचे दिसत नव्हते. आम्ही जस जसे पुढे जाऊ लागलो तसा प्रकार आमच्या लक्षात आला. हे कोणत्या वन्य प्राण्याचे नाही तर त्याच्या ही पेक्षा हिंस्त्र आणि तेवढ्याच क्षुद्र प्राण्याचे हे काम होते. आम्ही ही त्याच वंशातले होतो याची आम्हाला लाज वाटते. सांबरापाशी पोहोचल्या वर त्याच्या छाती मध्ये एक गोळी आणि मांडीवर एक गोळीची जखम दिसली. बिचार्‍याने बराच वेळ तडफडून जीव सोडल्याच्या खुणा दिसत होत्या. जीभ बाहेर आणि डोळे उघडेच होते. प्रकार पाहून खूप दुख झाले. जबरदस्त जनावर होते. ती एक पूर्ण वाढ झालेली मादी होती. त्याचे फोटो काढून आम्ही परत मनोर्‍याकडे परतलो. सगळ्यानी एक एक इरसाल शिवी त्या शिकार्‍याला दिली. आता तेवढेच आमच्या हातात होते. अभयरण्या मध्ये बघितलेला हा दुसरा प्रकार.


खिन्न मना ने समान परत बॅग मध्ये भरून आम्ही सांबर कोंडा चा रस्ता धरला. सकाळी १० ला आम्ही सांबरकोंडा ला पोहोचलो. तिथे पणि भरपुर होते. त्यामुळे मुक्काम तिथेच करायचा ठरले. मी प्रवीण आणि आशुतोष आम्ही पणि भरून आणण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागलो. तिथे एका झुडुपातून पिसोरि हरण पाळताना दिसले.
ट्रेक मधला पहिला मसाले भात तयार करण्यासाठी साहित्य बाहेर निघाले. मस्त पैकी जेवणाचा बेत उरकून सगळे झोपण्यास सज्ज झाले. मी उदय, सागर आणि प्रवीण जरा आजूबाजूच्या जंगलामध्ये फिरायला जायचे ठरवले होते. तसे आम्ही निघालो.
एका तळ्याच्या काठी आम्हाला प्राण्याचे भरपूर ठसे दिसले. तिथेच जरा शांत पणे बसायचे ठरवले. थोड्यावेळा ने समोरच्या झाडावर एक स्वर्गीय नर्तक आला. त्याचे थोडे फोटो काढून घेतले. ४ वाजता आम्ही तिथून उठलो आणि मुक्कामा च्या ठिकाणी पोहोचलो. मुक्काम तिथेच होता त्यामुळे दिवसा उजेडीच खिचडी करून घेण्याचे ठरले. पुन्हा तीच तयारी. खिचडी खाऊन घेतली. जंगलाच्या अगदी मध्ये मुक्काम असल्याकारणाने रात्रभर कोणी तरी जागे राहून पहारा देणे गरजेचे होते. त्यामुळे सगळ्याची २-२ तासाची ड्यूटी लागली. वर्ल्डकप चालू होता आणि आज इंग्लेंड आणि भारता ची मॅच होती. त्याची कॉमिंट्री थोडावेळ ऐकली व झोपी गेलो .. माझी शिफ्ट पहाटे ४ ची होती. ३-४ च्या दरम्यान एक उदमांजर खूप जोरजोरात ओरडत होते. शांततेत तो आवाज अतिशय भीषण वाटत होता. बराच वेळ ओरडत होते ते उदमांजर. माझी शिफ्ट सुरू झाली होती. मी त्याचे आवाज ऐकत ऐकत शेकोटी पाशी बसून होतो.


सकाळ झाली एक एक जण उठू लागला. ७ च्या दरम्यान एक मोठा पक्षी वारा कापत आमच्या डोक्यावरुन उडत गेला. पंखा च्या आवाजा मुळे सगळयांचे लक्ष तिकडे गेले. तो एक इंडियन पाइड हॉर्नबिल होता. दूरवर जाऊन तो एका झाडा वर बसला. थोडा वेळ त्याला न्याहाळले. पुन्हा पंखा चा भव्य विस्तार उलगडून तो सुंदर पक्षी दिसेनासा झाला .
आता जरा बसून चर्चा करून पुढचा प्लान करत होतो. २ दिवस राहिल्यावर प्राणी, पक्षी, निसर्ग पाहून बर्‍याच जणांचे मत होते की अजुन एक दिवस मुक्काम करायचा. अजुन दाट जंगलामध्ये जायचे. मला तर चार दिवस मुक्काम वाढवला असता तरी काहीही प्रॉब्लेम नव्हता. पण एकच माणूस याचा विरोध करत होता. आम्ही सामानाची आवारा आवर करून वाघाचे पाण्याचा रस्ता धरला. सगळे जण त्या विरुद्ध पार्टीच्या माणसाला समजवण्या साठी त्याच्या मागे पुढे मागे पुढे करत होते. पण तो त्याच्या विचारावर ठाम होता. वाघाचे पाणी आले सुद्धा पण काहीही उपयोग झाला नाही. तो नाही ते नाही तयार झाला. मी त्याला काही समाजवण्याचा प्रयत्न केला नाही. वाघाच्या पाण्यावर सगळे पोहोचले. पाण्यापाशी उतरलो. माझे आधीच डोके फिरले होते त्यात समीर मला काही तरी म्हणाला. मी त्याच्यावरच चिडलो. त्याने लगेच माझ्या तोंडावर एक म्हण फेकली "वड्या चे तेल वाग्या वर काढू नकोस. "..... झाले !!!!! उदय ने लगेच आशुतोष म्हणजे ज्याच्या मुळे ग्रूप मध्ये चीड चीड झाली होती त्याला सांगितले की समीर तुला वडा म्हणत आहे. त्याच्या या वाक्या मुळे सगळीकडे हाशा पिकला. पण आशुतोष वर काहीही फरक पडला नाही आणी आम्हाला दाजीपुर चा रस्ता धरावा लागला.

यावेळी तर प्राणी दिवसा उजेडी दिसलेच नाहीत पण रात्री बरेच प्राणी दिसले.
त्याचा तपशिल नकाशा खाली देत आहे ....





Tuesday, November 16, 2010

वासोटा ट्रेक २५-०१-२००१




कोयना अभयारण्या मध्ये जाण्याचा बेत पक्का केला. मी,समीर,दुष्यंत आणि राहुल असे चार जण होतो. दिनांक २५-०१-२००१ ला निघण्याचे ठरले. ठरल्या दिवशी आम्ही भोर वरुन सातार्‍यला पोहोचलो,सकाळचे १० वाजले होते. २ वाजता गाडी होती बमनोली या गावाला जाण्यासाठी. तो पर्यंत जेवण तयार करण्याचे सगळे साहित्य विकत घेतले आणि गाडी ची वाट पाहु लगलो. २ ची गाडी ३ ला निघाली आणि ४:३० ला बामणोलि या गावात पोहोचली. त्याच दिवशी पुढे कुसापूर ला जाण्या साठी लॉंच नव्हती त्यामुळे आम्हाला गावा तील मन्दिरा मध्ये मुक्काम करावा लागला. सकाळी लवकर उठून तोंड वगैरे धुवून घेतले आणि शिवसगर जलाशयावर जाऊन सरकारी लॉंच ची वाट पाहु लागलो. तोड्या वेळातच लॉंच आली आणि आमचा कुसापूर चा २ तसचा प्रवास सुरू झाला..७ ला सुरू केलेला प्रवास ८:५० ला संपला. कुसापूर ला उतरलो, कपडे बदलून माडोशी मार्गे नागेश्वर चा रस्ता धरला एक मोठा टप्पा चढून आल्यावर एका छोट्याशा मन्दिर सदृश मोकळ्या जागी पोहोचलो तिथे थोडा वेळ विश्रांती साठी सगळे जन विसवले. मी झाडमध्ये आजूबाजूला काही दिसते का ते पाहु लागलो .. एखादा साप किंवा एखादा प्राणी दिसावा हीच इच्छा. एकदम माझे लक्ष एका मोठ्या पतंग कडे गेले . जवळ जवळ २० सेंटी मीटर चा तो मॉथ शांत पणे रात्र होण्याची वाट पाहत लपून बसला होता . त्याचे फोटो काढून आम्ही पुढचा रस्ता धरला . पुढील रस्ता गर्द झाडी तून होता. झाडी अगदी दाट म्हणजे उन्हाचा कवडसा ही जमिनीवर पोहोचणार नाही याची त्यानी पूर्ण पणे काळजी घेतली आहे. झाडी तून चालताना अजिबात उन्हा चा त्रास झाला नाही आणि अर्ध्या तासा मध्ये एका मोठ्या पठारावर पोहोचलो. गवताळ भागात एखादा गवा किंवा एखादे हरिण दिसते का ते शोधू लागलो पण व्यर्थ. पठारच्या एका टोकावर जाऊन खाली दिसणारी दरी न्याहाळु लागलो. एका गवताळ जागे मध्ये गवा चारतां नजरेस पडला. सगळे जण गवा पाहत बसले आणि उठून मी जरा डाव्या बाजूला चालत गेलो. समोर एक मोठे झाड होते कशाचे ते काही समजले नाही पण त्याच्या खाली काही तरी चरताना दिसले . नीट दुर्बिन लावून पाहिल्यावर कळले ते एक भेकर आहे... निवंता चरत होते . आमच्या पासून त्याचे अंतर जवळ जवळ १०० मी असेल. थोडे पुढे जाऊन पाहु असा विचार करून त्या दिशेने पुढे सरकू लागलो पण त्याला आमची चाहूल लागली व ते क्षणात जवळील झाडी मध्ये दिसेनासे झाले. चला पठारावर काही तरी दिसल्यामुळे सगळ्याना बरे वाटले. आता आपेक्षा वाढु लागल्या.. बिबट दिसावा , अस्वल दिसावे असे सगळे बोलू लागले .. विचार आणि डोळे उघडे ठेवून लगेच आम्ही पुढचा रस्ता धरला ... समोर नागेश्वर चा सुळका दिसू लागला. समोर दिसत असला तरी आंतर कमी नव्हते आणि रस्ता थोडा अवघड ही होता. सुळक्यच्या पलीकडे चिपळूण चा परिसर दिसता होता . आता सगळा रस्ता उताराचा आणि दरीच्या कडेकडेने होता. एका जागी तर फक्त २-३ फूटचा रस्ता आणि दोन्ही बाजूला दरी. जी दरी तीव्र उतारा ची नव्हती त्या बाजूला तोल देत देत आम्ही तो टप्पा पार केला. २:३० ला नागेश्वर मन्दिरा मध्ये पोहोचलो. थोडी विश्रांती घेऊन पाणी आणण्यासाठी कुंडा कडे जाऊ लागलो. कुंडा पुढे असणार्‍या दरी मध्ये एक गवा मादी आणि तिचे १ वर्षाचे पिल्लू चरताना दिसले. आमची चाहूल लागताच मादी नाराजीने मान हलवत झाडी मध्ये घुसली नि पिल्लू तिच्या मागे चालते झाले. आम्ही पाणी घेऊन गुहे मध्ये परतलो.. मसाले भात करण्याच्या तयारी ला लागलो. फक्कड चविष्ट मसाले भात खाऊन १० ला झोपलो. रात्री दुरून भेकर भुंकल्या चा आवाज दरी मध्ये घुमत होता. बिबट किंवा वाघ शिकारी ला निघाल्याची ती सूचनच होती. आवाज ऐकत ऐकत कधी झोप लागली कळले नाही . सकाळी ६ ला मला जाग आली.. समोर च्या झाडा मध्ये निळा शैल कस्तुर मस्त शिळ घालत होता. शिळ ऐकत ऐकत तोंड धुण्या साठी नशीब घेऊन जन्माला आलो होतो मी .... खूप मस्त वाटत होते.. तोंड धुवून झाल्या वर जरा दरी मध्ये काही दिसते का पाहण्या साठी गुहे बाहेर जाऊन दरी मध्ये नजर फिरवली.
दरी मध्ये डाव्या बाजूला एक गवा चारताना दिसला, नजरे समोर एक कृष्ण सार गरूड सकाळचा नाश्ता शोधण्यामध्ये मग्न होता.. गंमत म्हणजे तो जिथून जिथून उडत जाई त्या त्या झाडावर बसलेले शेकरू लगेच त्याच्या वर आपल्या आवाजाच्या गोळ्या मारत होते. ऐकायला खूप मज्जा येत होती हे सगळे. मी उठलो आणि गुहे चा रस्ता धरला. थोड्या वेळात सगळे उठले आणि तोंड धुवून रात्री राहिलेल्या मसाले भाता वर ताव मारला आणि ११:०० वाजता वासोटा गडाचा रस्ता धरला. हा रस्ता ७-८ किमी चा असेल.. अर्धा रस्ता पूर्ण पणे दरी च्या कडे कडेने होता. बरोबर फक्त पाण्याच्या बाटल्या आणि काही खाण्याचे पदार्थ होते.. आज पाठीवर काहीही ओझे नव्हते त्यामुळे चालायला काही त्रास होत नव्हता. थोडे चालल्या वर उजव्या बाजू च्या दरी मध्ये लाल तोंडच्या माकडा ची एक टोळी दिसली. आम्हाला पाहून सरळ ते दरी मध्ये उतरून गेले.
त्याचा म्होरक्या आम्हाला भीती दाखवण्यासाठी आ वासून आमच्या वर धावून येत होता. थोडा वेळा ने तो हि दरी मध्ये निघून गेला. आम्ही हि पुढे झालो . डाव्या दरी मध्ये एक घोरपड पाळताना दिसली. दरी च्या कडे कडे ने चालणारी वाट संपली. आणि आम्ही प्रवेश केला कोयने च्या घनदाट झाडी मध्ये.

जंगल मध्ये शांत पणे चालू लागलो. उंच च्या उंच झाडे आणि त्यावरून पाळणारे शेकरू दिसत होते. गडाचा पायथा ते गडाचा दरवाजा हे अंतर पूर्ण पणे दगड गोट्या ने भरलेली आहे. ती चढाई चढून वासोटा किल्या वर पोहोचलो. मागच्या वेळी मला समोर असलेल्या मारुती मन्दिर मागे आस्वल दिसले होते. त्यामुळे परत दिसेल या आशे वर शांत पणे चालत गेलो पण काहीही नाही. मारुती मंदिर च्या पलीकडे ताई तेलिनिचा वाडा आहे. आता फक्त चौथरा राहिला आहे. मारुती मंदिर च्या डाव्या बाजूचा रस्ता धरला आणि पाण्याच्या कुंडा पाशी पोहोचलो. कुंडा च्या शेजारी एक कलिंगडा चा वेल होता. त्याला २ कलिंगडे पण आली होती. कलिंगडे कच्ची होती तरीही आम्ही तशीच खाऊन घेतली आणि बाबू काड्या कडे कूच केले. बाबू काड्या वर पोहोचलो. विशाल, रुद्र, कठीण, काळाकभिन्न असा तो सह्याद्रीचा कडा समोर उभा होता. सुसाट वारे वाहत होते. कॅमेरच्या एका फ्रेम मध्ये त्याचे रुद्र रूप बसत नव्हते . थोडे फोटो काढून आम्ही परत तळ्य पाशी आलो.


तळ्य वर पोहोचलो आणि समोर असणार्‍या दरी कडे पाहु लागलो... समोर शिवसगर जलाशयाचा काही भाग दिसत होता. हिरवी गार झाडी समोर पसरली होती. वासोटा च्या समोर असलेली झाडी ही दाट असली तरी सलग असे मोठे जंगल नव्हते. डोंगरा वर झाडी ची ठिगळे लावल्यासारखे दिसत होते. दरी मध्ये डाव्या बाजूला एक गवा चारताना दिसला. गवा अगदी गडाच्या खाली म्हणजे ज्या रस्त्या वरुन परत नागेश्वर ला जायचे होते त्याच रस्त्याच्या जवळच तो चारात होता. त्याच्या जवळ जाऊन फोटो काढण्याचे ठरवले. शांत पणे गड उतरू लागलो. खाली अजुन गवा दिसत होता ... अगदी शांत पणे चालू लागलो. अगदी ५०-६० फुटा वर गवा आला. अजुन त्याला आमची चाहूल लागली नव्हती. त्याचा एक फोटो काढला लगेच त्याला आमची चाहूल लागली आणि तो सरळ कारवि च्या रानात घुसला. आम्ही ही नागेश्वर चा रस्ता धरला . मागे दिसलेला गवा पुन्हा वाटे मध्ये उभा राहून आमच्या कडे पाहत उभा होता. त्याने थोडा वेळ आम्हाला पहिले आणि आम्ही ही त्याला परत पाहून घेतले. त्याचे पाहून झाल्यावर तो झर झर पाऊले उचलत पुढे निघून गेला. आम्ही ही चालत राहिलो. थोड्या अंतरा वर पुन्हा तोच गवा. पुन्हा नागेश्वर च्या वाटेवर तोच गवा दत्त म्हणून समोर उभा. यावेळी त्याने एक मोठा हुंकर टाकला आणि सरळ पळत दरी मध्ये उतरला .. त्याच्या चालण्याने झुडपे आणि झाडे कडा कड आवाज करत तुटत होते. शांत झाडी मध्ये तो आवाज अजुन मोठा येत होता. काही वेळाने पुन्हा निरव शांतता पसरली आणि आम्ही पुढचा मार्ग धरला. ६ वाजता पुन्हा नागेश्वर ला पोहोचलो. लपवून ठेवलेल्या बॅगा काढल्या आणि गुहे मध्ये परतलो. पुन्हा रात्री च्या जेवणा ची म्हणजे फक्कड खिचडी ची तयारी केली. खिचडी करणे चालू असताना पाऊस कोसळू लागला. मस्त पावसाचा आवाज ऐकत ऐकत खिचडी खाऊन झोपी गेलो. सकाळी कुंडा पासून जो पाण्या चा प्रवाह जातो त्याच्यातून सरळ चालत जाण्याचा प्लान होता. सकाळी उठून तोंड वगैरे धुवून आम्ही न्याहारी ला रात्री राहिलेली खिचडी खाऊन घेतली आणि ११ ला पुन्हा जंगलाची वाट धरली.
रस्त्या मध्ये भरपुर फुलपाखरे दिसली. पक्षी दिसले.. रान कोंबंडयाचे थवे दिसले. वाटेत एक झुडूप पार करताना समीर आधी त्याच्या मागे दुष्यंत त्याच्या मागे मी आणि माझ्या मागे राहुल असा क्रम होता.. आम्ही तिघे पुढे झाल्या वर त्या झुडुपा मध्ये राहुल ला वळवळ जाणवली. तो होता एक हरणटोळ. चांगला ३ फुट लांबीचा होता,


उन्हाला आला असेल मोकळ्या जागेत. त्याला पकडून त्याचे फोटो सेशन झाले व त्याला त्याच्या जागी सोडून आम्ही पुढे निघालो.
पुढे एक पाण्याचे डबके दिसले, तिथेच लपून बसण्याचा विचार केला. पण तेवढ्यात पाऊस सुरू झाला. आम्ही एका खडकाचा आश्रय घेऊन बसून राहिलो. थोड्या वेळात पाऊस थांबला आणि आम्ही पुन्हा पाण्याच्या डबक्या जवळ जाऊन बसलो. काही वेळात आमच्या दिशेने काही आळ्या सरकू लागल्या. त्याना किती ही दूर ढकलले तरीही त्या आमच्या च दिशेने येवू लागल्या ... थोडा वेळ तिथेच बसून तिथून उठलो आणि वसोत्याच्या दिशेला असलेल्या जंगल मध्ये घुसलो. आता आम्ही पुन्हा वासोट्या च्या पायथ्याला पोहोचलो होतो. सरळ नागेश्वर च्या दिशेने चालण्यास सुरूवात केली . एका सपाटीला आल्यावर झाडी तून काही तरी पळत आल्याचा आवाज आला. अगदी आमच्या समोर एक सम्बर पळत येताना दिसले, त्याच्या मागे अजुन काही तरी पळत होते पण आमची चाहूल लागून ते तिथेच थांबले आणि सांबार सरळ खाली दरी मध्ये पळत गेले. मागे काय पळत आले हे पाहण्या साठी मी जरा पुढे जाऊन काही दिसते का ते पाहण्याचा प्रयत्न केला पण काहीही दिसले नाही. पुन्हा आम्ही सपाटीला आलो. तेवढ्यात माझ्या पायावर काही तरी वळवळ जाणवली, पॅंट वर करून पहिले तर एक जळू. लगेच तिला ओढून काढले. माझ्या अंगावर जळू म्हणजे इतरांच्या अंगावर ही असु शकते. आता सगळ्यानी कपडे काढण्यास सुरूवात केली आणि अंगा चा एक न एक भाग तपासायला सुरूवात केली. दुसरी जळू सापडली ती राहुल च्या बुटा मध्ये, आणि ती पहिल्या वर त्याची जी प्रतिक्रिया होती ती अजुन ही आमच्या मनात ताजीतवानी आहे.
त्याने मागचा पुढचा विचार न करता जळू ओढून काढली त्या सरशी रक्ता ची चिळकांडी माझ्या आंगा वर उडाली. ती जळू डबी मध्ये भरली. बाकी कोणाच्या अंगावर जळवा नव्हत्या. मघाशी ज्या आळया आमच्या दिशेने सरकत होत्या त्या सगळ्या जळवा होत्या हे कळले. जळु बरोबर घेऊन नागेश्वर चा रस्ता धरला . त्या जळु चे फोटो काढून तिला सोडून दिले. दुसर्‍या दिवशी परतीचा प्रवास करायचा होता आणि सगळे जाम दामले होते त्यामुळे रात्री फक्त नुडल्स केले. रात्री पासूनच पावसाला सुरूवात झाली. दुरून भेकरचे आवाज येऊ लागले. पाऊस आणि भेकर असे संगीत ऐकत झोपी गेलो.
सकाळ पासून च ढग दाटून आले होते. पटकन सगळे समान भरले आणि पाण्याच्या कुंडा चा रस्ता धरला... पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि माडोशी ची वाट धरली तेवढ्यात पावसाळा सुरूवात झाली . पावसाचा जोर चांगलाच वाढला , सगळी कडे धुके दाटून आले. आणि जस जसे वर वर चढत होतो तसतसे गार वारे अंगाला लागत होते. काही वेळातच पूर्ण भिजून गेलो. गार वार्‍या ने माझा कान दुखू लागला. वर पठारा वर पोहोचलो सगळी कडे दाट धुके. तिथे रस्ता चुकलो. पण लगेच रस्त्याला लागलो आणि झप झप पाऊले उचलत कुसापूर कडे कूच केले.१:३० ला कुसापूरला पोहोचलो. मोकळ्या मैदाना मध्ये कपडे बदलून घेतले. ऊन पडल्या मुळे जरा बरे वाटू लागले. माडोशीतील एका कुटुंबा ला आम्ही आमच्या कडे राहिलेले अन्न पदार्थ देऊन टाकले. जलाशयावर येऊन लॉंच ची वाट पाहु लागलो. पुन्हा २ तासा चा प्रवास करून बामणोलि ला पोहोचलो. तिथे पोहोचल्या वर कळले की सातार्‍या ला जायला आज बस नाही, पण आजच घरी पोहोचायचे ठरवले होते त्यामुळे मस्त पैकी चहा आणि बिस्कीटे खाऊन घेतली आणि सातार्‍या ला पायी जाण्यास निघालो. ३५ किमी. अंतर होते.

अर्ध्या तसा मध्ये मधून मधून चालत जाऊन ५ किमी चे अंतर पार केले. तेवढ्यात एक टेंपो आला. तो ही सातार्‍या ला जाणारच होता. बॅगा टेंपो मध्ये टाकून सातार्‍या मध्ये पोहोचलो. तिथून सगळे आपापल्या घरी सुखरूप परतले.

या ट्रेक मध्ये आम्हाला साप , निरनिराळे फुलपाखरे, अनेक शेकरू,गवे, सांबार, घोरपड अशा अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या.

खालील फोटो मध्ये कुठे काय दिसले ते सूचीत केले आहे.

सर्पवेड्या बरोबर एक दिवस




नमस्कार !! आज काल टीव्ही किंवा वर्तमान पत्रा मध्ये निवडणुकीच्या काळात या नेत्या बरोबर एक दिवस त्या नेत्या बरोबर एक दिवस असे कार्यक्रम भरपूर येत असतात. माझा हा ब्लॉग ही त्याच्या पठडीतला असला तरी थोडा वेगळा आहे .असा ब्लॉग लिहीण्याचे मी आधी ठरवले नव्हते पण ज्याला मी भेटायला गेलो होतो त्याचे काम पाहून मला ब्लॉग लिहुन त्याचे काम काही लोका पर्यंत पोहोचवावे असे वाटले..
२-३ दिवसा पुर्वीच नारायणगावा जवळील पिंपलवांडी नावाच्या गावामधील माझ्या मित्राला भेटण्याचे ठरवले होते. तो एक सर्प मित्र आहे. त्याने मला फोन करून सांगितले होते की त्याच्याकडे बरेच साप आहेत आणि चांगले पूर्ण वाढ झालेले विषारी साप. त्यामुळे लगेच मी जाण्याचे ठरवले. १३-११-२०१० ला जाण्याचे ठरले. न कर्त्याचा वार होता पण तरीही निघालो.
आता हा मित्र कोण?? त्याचे नाव कैलास पोफळे. माझी आणि त्याची ओळख नारायण गाव बस स्टॅंड वर झालेली. त्यानेच सुरूवात केली प्रथम माझ्याशी बोलण्यास. प्रसंग असा की मी गेलो होतो जुन्नरला बिबट गणना मोहिमेमध्ये. काम संपवून परत घरी जात होतो. गाडी ची वाट पाहत बस स्टॅंड वर बसलो होतो. माझ्या कडे ट्रेकिंगची बॅग होती. ती पाहून हे महाशय माझ्याकडे आले आणि विचारपूस करू लागले. मग आमची गट्टी जमली. अशी माझी आणि याची ओळख झाली. हा माणूस एक रानटी सर्प प्रेमी.
रानटी म्हणण्या चे कारण असे की साप कुठेही आणि कसाही असला तरी त्याला हा गडी पकडणार म्हणजे पकडणाच. त्याच्या रानटीपणा चे एक दोन किस्से येणारच आहेत पुढे. सापबद्दल माहिती असणारे लोक भरपूर पण या माणसाला सापांच्या स्वभावा बद्दल जास्त माहिती. त्यामुळे प्रसंग पाहून हा साप पकडणारा इसम. आजूबाजूच्या लोकाना त्याचा हा प्रकार रानटी वाटत असेल म्हणून मी हा शब्द वापरला. योग्य शब्द सापचे स्वभाव ओळखणारा त्याला लागू होऊ शकतो. निघालो सकाळी लवकर निघालो. बरोबर १० ला त्याच्या कडे पोहोचलो. माझ्या साठी हा त्याच्या मित्रा ला घेऊन स्टॅंड वर आला होता. लगेचच साप बघण्यासाठी मी त्याच्या घरी गेलो. घरा समोर एक काचेची पेटी केली होती त्याच्या मध्ये जवळजवळ ९-१० साप होते. ४ नाग, ४-५ घोणस आणि एक मण्यार. मी सापचे फोटो काढण्यासाठी येणार होतो हे त्याला माहीत होते. लगेच त्याने मोठ मोठे २ नाग, ३ घोणस आणि एक मण्यार बरोबर घेतले. हे सगळे एका पोत्या मध्ये घालत असताना बरेच लोक जमले. आणि मग लोकांची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. काही प्रश्नांची उत्तरे त्याने दिले पण नंतर मात्र एकदम वैतागून एका व्यकतीस म्हणाला जरा शांत रहा मला माझे काम पूर्ण करू द्या मग मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो. त्यासरशी सगळे गप गार. सगळे साप पोत्या मध्ये भरून आम्ही निघालो. एक मण्यार आणि एक घोणस माझ्याकडे आणि बाकीचे त्याच्या जवळ. त्याचे मित्र काकडे सुद्धा बरोबर होते. गावातून सगळा पसारा घेऊन आम्ही एका शेतावर गेलो. एक एक साप बाहेर काढून वेगवेगळ्या अँगल ने फोटो काढून घेतले आणि तेवढ्यात त्याचा फोन खणाणला. रिंग टोन तर कुठली नागाची पुंगीच. फोन दुसरा तिसरा कसला नसून साप निघाल्याची बातमीच होती ती.. मला सुद्धा बरे वाटले चला साप पकडायला मिळणार म्हणून. साप मित्राच्या लॅब मध्ये ठेवून आम्ही पहिल्या कॉल वर निघालो. आम्हाला येताना पाहून लहान मुलानी एकच गलका केला आणि न सांगता साप असलेल्या ठिकाणी पळत सुटले. त्यामुळे साप कुठे आहे हे विचरण्यचि गरज पडली नाही. आम्ही ही त्या दिशेला निघालो. घरच्या मागच्या बाजूला सरपण रचले होते त्याच्या खाली साप आहे असे सगळे जण सांगत होते.

कैलास ने लगेच सरपण हलवण्याची सूचना केली. सरपणाच्या खाली उंदारांची बिळे होती आणि त्याच्या मध्येच साप गेला आहे असे सगळ्यानी सांगितले. दुसरी सूचना बिळे उकरण्याची झाली. लोक तो सांगेल तसे करत होते. पूर्ण बिळे उकरुन झाली पण उंदरांशीवाय काहीही निघाले नाही. हे सगळे चालू असतानाच कैलास च्या फोन ची पुंगी वाजली. या वेळी शिंदे बामणी मळा नावाच्या परिसरातून बोलावणे आले होते. घरा मध्ये साप होता. हा साप तर काही हाती लागला नाही. तिथून आम्ही शिंदे बामणी मळा परिसरं मध्ये पोहोचलो. मस्त बाग होती. घरापासून दूर एक खोली होती त्याच्या मध्ये साप होता. आम्ही जसा खोली मध्ये प्रवेश केला तर आतील पसारा पाहून साप कसा शोधायचा विचार करू लागलो. आता या माणसा वर सूचना पाळण्याचि वेळ आली होती. सूचना होती सगळे समान बाहेर काढणे. त्याने सगळे समान बाहेर काढले आता फक्त धान्याची पोती राहिली होती. ती बाजूला केली आणि त्याच्या खालून ७-८ उंदीर आणि एक ६ फुट लांब धामण निघाली. तिला पकडले. न मागता त्या व्यक्ती ने कैलास च्या हातावर थोडे पैसे ठेवले. पैसे आणि धामण घेऊन आम्ही तिथून निघालो.
पकडलेलि धामण एका ओढ्याच्या कडेला सोडुन घरी जातच होतो की लगेच परत पुंगी वाजली आणि सापाचे बोलवणे आले. रस्त्या मध्येच एका वस्तीवर साप होता... एक माणुस सापावर पेटी ठेऊन त्याच्या वर बसला होता व कैलास ची वाट पहात होता. तिथे सुद्धा एक छोटिसी धामण होती. ती घेतलि आणि घरा कड़े निघालो. मध्येच धामण सोडुन आम्ही घरी पोहोचलो. आज दिवस भरा मध्ये ३ कॉल आले आणि त्याच्या मधले २ यशस्वीपणे पूर्ण ही झाले.



कैलासचा रोजचा दिवस असाच जाई. ४-५ कॉल्स आणि तेवढेच कॅच. हा माणूस काही खूप मोठा श्रीमंत नाही किंवा नोकरीवाला ही नाही. लग्न कार्ये, पूजा अशा ठिकाणी स्वयंपाक बनवून आपला आणि आपल्या आई, बायको आणि २ लहान मुले यांचा संसार चालवायचा. या माणसाने आज पर्यंत जवळ जवळ ३०००-४००० साप पकडले आणि वन खात्याच्या मदतीने राना मध्ये सोडून ही दिले आहेत. १०० च्या वर शाळा मध्ये याने सापावर व्याख्याने ही दिली आहेत. व्याख्यान पूर्ण झाल्या वर तो आपला मोबाइल न. सगळ्या विद्यार्थ्याना देतो आणि कधीही घरा जवळ साप निघाला तर सापा ला मारण्या पुर्वी मला एकदा फोन करा अशी कळकळी ची विनंती ही करतो. गावामध्ये फिरताना मला एक ही माणूस असा भेटला नाही ज्याने कैलास ला ओळख दिली नाही. सगळ्यांशी पूर्णपणे हसून खेळून त्याचे काम चालू असते. त्याचे एक एक वाक्य मी टिपत होतो. एका मारुती नावाच्या माणसाला तो सहज म्हणाला ..."काय मारुती ! कधी जाणार वरती ?" त्या माणसाने ही हसत हसत याला उत्तर दिले तुझ्या नंतर.
पूर्ण ३ कॉल्स मध्ये मी त्याच्या बरोबर होतो. कोणत्याही घरा कडे बोट दाखवून तो म्हणायचा की इथे हा साप पकडला, इथे तो साप पकडला. हा साप पकडताना अशी मज्जा आली. आता त्यानेच एक किस्सा मला सांगितला. तो असा की हा कामानिमित्त कुठे तरी बाहेर गावी गेला होता. तिकडेच त्याला गावावरुन सारखे फोन येऊ लागले सापासाठी. त्याने सांगितले की मी तरी लवकर येऊ शकणार नाही तुम्ही तुमच्या जवळच्या सर्प मित्राला बोलावा. त्यानी ही लगेच ३-४ जणाना बोलावून घेतले. २-३ तास ते तिघे जन सापाशी लढले पण साप काय त्याना जवळ येऊ देत नव्हता .५-६ फुट मोठा नाग होता पूर्ण पणे चपळ आणि तेवढाच सावध. तो बसला होता खिडकी मध्ये . तिथे असलेली पारव्याची पिल्ले खायला गेला असेल बहुतेक. आत मध्ये सापाला जाता येत नव्हते आणि बाहेर माणसे त्यामुळे तो खाली ही उतरत नव्हता आणि या चार -पाच जाणानि त्याला चांगलेच सतावले होते. तो पूर्ण फणा वर करून बसला होता... घर मालकाला जाणवले की हे काम ह्यांच्या कडून होणार नाही. त्यानी पुन्हा कैलासला फोन लावला ... कैलास म्हणाला माझे काम झाले आहे, मी येतोच. १५-२० मी. मध्ये तो तिथे पोहोचला. साप कुठे आहे ते पहिले आणि मालकाला म्हणाला एक बेडशीट द्या मला. त्याने बेडशीट आणले. या पठ्याने ते हाताला पूर्ण पणे बांधले आणि शीडी वर चढला आणि सरळ हात घालून त्या नागाच्या फण्या खाली धरले. नागा ने चावायला सुरूवात केली पण दात काही कैलासच्या त्वचेपर्यंत पोहोचले नाहीत. साप घेऊन महाशय १० व्या मिनिटाला खाली. साप जमिनी वर सोडला आणि त्या पोराना म्हणाला आता पकडा. असा हा रानटी कैलास. लोक त्याच्या कडे अवाक् होऊन पाहु लागले..


त्याचा मोबाइल न. जवळ जवळ १-२ लाख लोकाकडे असेल. आणि हा फक्त साप पकडूनच किंवा त्यांचे प्राण वाचवूनच थांबला नाही तर ज्याना साप चावला आहे त्यांचा ही खूप काळजी घेतो. जिथे जिथे सर्पदंशा वर उपचार होतो तिथे तिथे या माणसाच्या शब्दाला किंमत आहे. प्रथम उपचार करून दवाखाना गाठण्याची जबाबदारी ही याचीच. बर्‍याच वेळा साप चावून घेतलेला हा कैलास, याची पुण्यातील ससून मध्ये ही याची चांगली ओळख.
साप सुद्धा साधे सुधे नाहीत ह:. तो परिसर पूर्ण पाने नाग आणि घोणस साठी प्रसिद्ध. एक तरी कॉल घोणस किंवा नागा चा असतोच. आजूबाजूला सगळी कडे ऊस आणि बागायत जमीन. भरपुर उंदीर आणि भरपुर साप.
कैलास बद्दल अजुन एक गोष्ट इथे सांगावी वाटते ती ही की उदारनिर्वहा साठी अगदी जेमतेम काम असणारा हा माणूस साप पकडाल्याचे पैसे कधीही कोणाला ही मागत नाही.. असला धंदा करणारे बरेच पहिले आहेत मी. त्याच्या आजूबाजूच्या गावा मध्ये पण भरपुर मुले तयार झाली आहेत. पण हा कधीही पैसे मागत नाही .... पण लोक आता त्याला स्वताहून पैसे देऊ लागले आहेत .. त्याच्या जवळ स्व:ताची गाडी नाही पण कधीही साप पकडायला जात असताना त्याचा कोण ना कोण तरी मित्र त्याला साप असलेल्या ठिकाणी सोडायला येतो जरी ते ठिकाण गावा पासून २०-२५ किमी दूर असले तरी. भरपुर मित्र


परिवार आणि भरपुर ओळख असलेला हा कैलास आपल्या नावाला जगात होता ... कैलास म्हणजे जिथे भगवान शंकर यांचा वास होता. त्याच प्रमाणे हा सगळ्या सापाना आपल्या मध्ये सामावून घेत होता.
कधी जायला मिळाले तर अवश्य जाऊन भेटा त्याला.
नारायणगाव च्या पुढे नाशिक रोड वर पिंपळवडी नावाचे गाव आहे. तिथे कोणाला ही विचारा. त्याच्या घरी नेऊन सोडतील तुम्हाला . आणि त्याच्या कामा वर खुश होऊन जर द्यावेसे वाटले तर हातभार म्हणून ४ पैसे हातावर ठेवायला विसरू नका.
भीक किंवा सहानुभूती म्हणून नाही तर चांगल्या कार्यामध्ये आपला सहभाग या साठी.
अशा माणसा बरोबर एक दिवस संपवून मी पुन्हा ऑफीस आणि पैशासाठी पुण्यांच्या दिशेने येण्यास निघालो.

वासोटा ट्रेक १८-११-२००२




पुन्हा एकदा कोयना अभयारण्याचा बेत ठरला. यावेळी आम्ही ४ जण होतो. मी, समीर,उदय आणि विशाल.
विशाल प्रथमच अभयारण्यामध्ये निघाला होता. तो जरा जास्त उत्साही दिसत होता.
मी आणि समीर भोर वरुन सातार्‍याला पोहोचलो. विशाल पुण्यावरुन आणि उदय कोरेगाववरुन आधीच पोहोचले होते.
आम्ही सामनाची खरेदी करायला निघालो. यावेळी थोडे चिकन किंवा मटण आणि केळी घेण्याचा प्लान होता. एखाद्या पानतळीच्या जागी हे पदार्थ ठेवून आजूबाजूला लपून बसून येणारे प्राणी पाहण्याचा प्लान होता.
चिकन, केळी आणि खाण्याचे साहित्या घेऊन आम्ही स्टॅंड वर आलो. २ च्या बामणोली गाडी मध्ये बसून आम्ही ४ ला बामणोली मध्ये पोहोचलो. शिवसागर जलाशया वर जाण्यास निघालो पण वाटेतच एका ने कुसापूरला जाणारी नाव गेल्याचे सांगितले. पुन्हा एकदा भैरवनाथ मंदिर मध्ये मुक्काम पडला. वसोट्याला जाण्यासाठी सकाळी अजुन २ गट आले . वन खात्याची रीतसर परवानगी घेऊन एका लॉंच ने वासोट्याच्या पायथ्याला पोहोचलो. २ त|सा चा जल प्रवास खूपच आल्हाददायक झाला.
आमच्या बरोबर चा ग्रूप वासोट्याला मुक्काम करणार होता. त्यामुळे आम्ही नागेश्वरला जाण्याचा निर्णय घेतला. वासोट्याच्या पायथ्याला उजव्या बाजूला असणार्‍या ओढ्या मधून सरळ गेल्यास नागेश्वरला पोहोचता येते. तिथेच आमचे स्वागत जलवा नि केले. काही जलवा डबी मध्ये भरून आम्ही ओढ्यातून पुढे निघालो. ओढ्यातून रस्ता असल्या मुळे मोठ मोठे दगड धोन्डे पार करत चालणे जरा अवघड जात होते. विशाल चे बूट तर सारखेच घसरत होते आणि तो सारखा पडत होता आणि त्याच्या पडण्याने सगळी शांतता भंग होत होती. आजूबाजूचे पक्षी, फुलपाखरे बघत बघत आम्ही पुढे सरकत होतो. मध्येच उदय ने सगळ्याना थांबायला सांगितले व एक पक्षी दाखवला... तो होता स्वर्गीय नर्तक. सुंदर पक्षी आपली एक फूट लांब शेपटी सांभाळत सांभाळत इकडे तिकडे उडत किडे पकडत होता. आम्ही पुढे निघालो. रस्त्या मध्ये आम्हाला भरपूर पक्षी दिसले, शेकरू दिसले. संध्याकाळी ६ च्या दरम्यान आम्ही नागेश्वरला पोहोचलो. येतानाच कुंडा मधून पाणी आणले होते. मसाले भात करण्याच्या तयारीला लागलो.. भात, पापड, लोणचे, चटणी कांदा एकदम मस्त जेवण झाले. गप्प मारत आणि दुसर्‍या दिवशी चे प्लॅनिंग करत झोपी गेलो. रात्री उंदीर अंगा वरुन गेल्याचे जाणवले. छतावर बर्‍याच पाली फिरत होत्या. त्या कायम तिथेच दिसतात.


सकाळी चहा, बिस्कीटे खाऊन आम्ही वासोट्याच्या पायथ्याला असणार्‍या जंगलामध्ये जाण्यास निघालो. बरोबर आणलेले चिकन आणि केळि घेतली. त्यांचा आज उपयोग करायचा होता. वासोट्या च्या वाटे वर आम्हाला काल चा ग्रूप भेटला. आज ते नागेश्वरला चालले.
चिकन आणि केळि पाणवठ्याच्या कडेला टाकून तिथेच लपून बसायचे असा प्लान होता. वासोट्याची वाट न धरता आम्ही डावी कडे जंगल| मध्ये घुसलो. काही वेळ चालल्यावर एक पाणवठा दिसला. आजूबाजूला झाडी आणि मध्येच मोकळी जागा होती. त्याच ठिकाणी बसायचा निर्णय घेतला. चिकन आणि केळी एकाच पिशवी मध्ये होते आणि त्यात भर म्हणून की काय पण साखर ही मिक्स झाली होती.. पिशवी उघडताच एकदम घाणेरडा वास सुटला. चिकन सडले होते केली त्यात कुसकरुन गेली होती आणि वरुन साखर पेरली होती. हा असा वास उदय ला पेढ्या सारखा वाटला. त्याला कसली ही घाण वाटली नाही सरळ पिशवी मध्ये हात घालून त्याने एक एक चिकन पेढा जंगल| मध्ये वाटायला सुरूवात केली म्हणजे इकडे तिकडे पसरायला सुरूवात केली. मग पाणवठयावर हात धुवून आम्ही आजूबाजूच्या झाडा वर स्थानापन्न झालो. १५-२० मी. शांत पणे गेली असतील तोच एक मून्गूस आमच्या समोरच्या झाडी तून बाहेर आले. आणि इकडे तिकडे फिरू लागले . पण त्याला चिकन चा वास येत नव्हता. वार्‍या ची दिशा ही मुंगुसा कडून आमच्या कडे होती आणि चिकन हे आमच्या दोघांच्या मध्ये होते त्यामुळे त्याला त्याचा वास आला नाही. थोडा वेळ इकडे तिकडे फिरून महाशय पुन्हा झाडी मध्ये अदृश्य झाले. आता झाडावर बसून आम्हाला जवळ जवळ एक तास झाला होता. हात पाय अवघडून आले. नीट बसता ही येत नव्हते. आमची हालचाल वाढली त्यामुळे तिथून निघायचा विचार केला. तिथून उतरून आम्ही पुन्हा नाल्याच्या दिशेने जाऊ लागलो ज्यातून काल नागेश्वरला गेलो होतो. वाटेमध्ये अतिशय घनदाट जंगल लागले. पूर्ण काळोखमय जंगल होते ते. तिथेच विशालला एक लाकुड सापडले ज्याच्या वर खूप सुंदर मशरूम उगवली होती. विशाल ने लाकूड बरोबर घेतले. काही वेळातच आम्ही नाल्यामध्ये उतरलो आणि नागेश्वर च्या दिशेने पुढे सरकू लागलो. तेवढ्यात आम्हाला कुत्र्याचे आवाज ऐकू येऊ लागले ... १०-१५ कुत्री आणि ४-५ लोक आम्हाला दिसले. हे लोक शिकारी साठी आले होते. आम्ही ओढ्यातून चाललो होतो. डाव्या बाजूच्या टेकडी वर कुत्री आणि माणसे एका मोठ्या दगडाखाली काही तरी पकडत होते. मी लगेच त्याच्या जवळ गेलो. ते लोक त्या दगडा लागत खडडा खणत होते. सगळी कुत्री त्या दगडाच्या आजूबाजूला बसली होती. तिथून समोर दिसणार्‍या डोंगारावरही काही माणसे दिसत होती. समोरचा डोंगर त्यानी व्यापून टाकला होता. आणि ते सगळे लोक हकारा देत होते. आणि त्यानी एकदम एका प्राण्याला उठवले. प्राणी सरळ समोरील टेकडी वरुन खाली यायला लागला . झाडी मुळे मला काही दिसेना पण झाडी तूटल्याचा आवाज मात्र खूप जोरजोरात येत होता.


थोड्यावेळात एक काळी आकृती समोरून पाळताना दिसली. ते एक झिपरे अस्वल होते. सगळे जण ओरडत होते डोलारा आला डोलारा आला. तेंव्हा कळाले की अस्वलला ते डोलारा म्हणतात. आणि असतेच ते तसे. डोंगरा वरुन मोठा दगड सोडावा तसे हा डोलारा झाडे झुडपे तोडत खाली येताना मला नीट दिसला.
काही वेळाने हाकार्‍याने त्या लोकानि पुन्हा एक सांबर उठवले. समीर,विशाल आणि उदय ही आता माझ्यापर्यंत पोहोचले होते. सांबर आमच्या समोर च्या टेकडीवर मोकळ्या जागे मध्ये आले होते. आता ते सगळ्याना दिसत होते. ते जसे सपाटीला आले की लगेच सगळ्या लोका नि हो हो हो हो असे ओरडाण्यास सुरूवात केली. सगळी कडून आवाज येत असल्याक|रणा ने त्या सांबराला कळेच ना कुठे पळायचे ते.. अगदी सममोहित झाल्या सारखे ते एकाच जागी उभे राहीले व इकडे तिकडे पाहु लागले . बंदुकवाला त्याला बंदुक सरसाऊन निघाला तोच त्याच्या बंदुकी च्या घोड्याला कारविची फांदी लागून दोन्ही गोळ्या उडाल्या आणि त्या सरशी सांबर दूर झाडी मध्ये दिसेनासे झाले. आम्हाला हायसे वाटले .. शेवटी निसर्ग च आला आपल्या बाळाच्या मदतीला असा एक विचार मनात आला. पण दगडा खालच्या प्राण्याचे भाग्य इतके चांगले नव्हते. कुत्र्यानि त्याचा जीव घेतला होता . लोकानि त्याला बाहेर काढले लगेच त्याचे गाठोडे केले आणि चालते झाले.. ते एक पिसोरि हरण होते. आम्ही काहीही करू शकलो नाही त्या जिवा ला वाचवण्या साठी. चर्चा करत नागेश्वर ची वाट धरली. वाटेमध्ये एक कुत्रे बसले होते. त्याच्या पायाला जखम झाली होती त्यामुळे ते तिथेच बसून राहीले होते. त्याचे मालक आणि बाकीच्या कुत्र्या बरोबर त्याला चालता आले नाही त्यामुळे ते मागे राहीले होते. पण आमच्या मागे ते चालू लागले. त्याचा आणि आमचा वेग जुळला. आम्ही त्याला घेऊन नागेश्वरला पोहोचलो .
दुसर्‍या दिवशी घरी जाण्याचा बेत होता त्यामुळे आज रात्री ही जंगल| मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. जेवण झाल्या वर बॅटरी घेऊन आम्ही गुहेच्या बाहेर पडलो. थोडेच पुढे गेलो असेल समोरच्या झाडा वर डोळे चमकले. तो एक रातावा होता. थोडे पुढे गेल्या वर पुन्हा डोळे चमकले. डोळ्यामधील अंतर जास्त होते. त्यामुळे तो एखादा मोठा प्राणी असावा म्हणून हळू हळु पुढे जाऊ लागलो. तो एक गवा होता. झाडपाला खात असताना त्याने आमच्या कडे पण नजर ठेवली होती. थोडा वेळाने तो निघून गेला आणि आम्ही पुढे झालो. थोडे पुढे गेल्या वर वाटेमध्ये एक सांबर दिसले. कुंडा कडे जाण्या साठी निघालो. तिथे दिसले काहीच नाही फक्त झाडी मधून प्राणी चालण्याचा आवाज तेवढा येत होता. आम्ही गुहे कडे परतलो.
सकाळी लवकर उठून आम्ही परतिचा प्रवास सुरू केला. वाटे मध्ये शेकरू शिवाय काहीही दिसलें नाही.
हनुमान मंदिर परिसरा मध्ये थोडे फोटो सेशन झाले आणि आम्ही शिवसागर जलाशाया वर पोहोचलो . वाटेत एक तस्कर जाती चा साप ही दिसला. थोडावेळ पाण्या मध्ये पोहून घेतले आणि मॅगी करायला घेतली. तेवढ्यात नाववाला आला. तयार मॅगी न|वेमध्येच खाण्याचा निर्णय झाला. घरी परतण्याचा प्रवास सुरू झाला होता . रात्री ८ ला मी समीर आणि उदय भोरला पोहोचलो. विशाल सातार्‍या वरुनच पुण्याची गाडी पकडली होती. आमच्या बरोबर नागेश्वरला आलेले कुत्रे आम्ही लॉंच मधून बामणोली ला आणून सोडले होते.

या ट्रेक मध्ये गमतीदार प्रसंग खूप घडले.
सगेळ विशाल शी निगडीत होते. उदय आणि माझे बरेच मनोरंजन झाले. याच ट्रेक मध्ये नवनवीन म्हणीचा शोध लागला. उदाहरणार्थ "ऐकवे जनाचे आणि करावे चुकीचे"
विशाल ने घेतलेल्या मशरूम च्या काठीचा ही चांगला किस्सा आहे.
पण वाईट हेच की या कोयना अभयारण्यामध्ये अजुन ही दिवसाढवल्या शिकार चालत होती आणि ती ही इतक्या मोठ्या प्रमाणात. वनअधिकार्‍याना सगळी माहिती देऊन आम्ही घरी पोहोचलो होतो.